“सोनई अत्याचार” प्रकरण पेटले!जयदीप कवाडे यांची मागणी आरोपींवर मोका लावा, वैरागर कुटुंबाला तातडीने पोलीस संरक्षण द्या! सचिन मोकळं अहिल्यानग...
“सोनई अत्याचार” प्रकरण पेटले!जयदीप कवाडे यांची मागणी आरोपींवर मोका लावा, वैरागर कुटुंबाला तातडीने पोलीस संरक्षण द्या!
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर (दि.२६):- नेवासा तालुक्यातील सोनई गावातील मातंग समाजातील युवक संजय वैरागर याच्यावर झालेल्या अमानुष अत्याचार प्रकरणाने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. या घटनेची गंभीर दखल घेत पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे नेते आणि लघुउद्योग विकास महामंडळाचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) जयदीप भाई कवाडे यांनी आज जिल्हा रुग्णालयात भेट देऊन वैरागर यांची प्रकृतीची विचारपूस केली.
या भेटीदरम्यान कवाडे यांनी या घटनेबाबत संताप व्यक्त करत “ही केवळ एका व्यक्तीवरची मारहाण नसून संपूर्ण मातंग समाजावरचा हल्ला आहे” असे म्हटले. त्यांनी सरकार आणि पोलीस प्रशासनाला थेट इशारा देत या प्रकरणातील आरोपींवर मोका अंतर्गत कठोर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच वैरागर कुटुंबाला तातडीने पोलीस संरक्षण देण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली.
कवाडे म्हणाले > “संजय वैरागर यांना अमानुष पद्धतीने मारहाण करून हातपाय तोडण्यात आले, डोळा फोडण्यात आला, तसेच अंगावर लघुशंका करण्यासारखी अमानुष कृत्ये करण्यात आली. आरोपींना अद्याप अटक झाली नाही, हे अत्यंत दुर्दैवी आहे. त्यांना राजकीय संरक्षण मिळत असल्याचे स्पष्ट दिसते. त्यामुळे तातडीने कठोर पावले उचलणे आवश्यक आहे.”
या प्रसंगी पीआरपीचे जिल्हाध्यक्ष सुमेध गायकवाड, युवक प्रदेश संघटक कपिल लिंगायत, जिल्हा नेते किरण गायकवाड, महिला जिल्हाध्यक्षा गौतमी भिंगारदिवे, तसेच सागर ढगे, सुरेश भिंगारदिवे, शांतवणं साळवे, राधा पाटोळे, विशाल गायकवाड, अनिकेत विधाते, प्रवीण कोल्ह, भारत कोल्ह, सिद्धांत गायकवाड, ऋषि गायकवाड आदी पदाधिकारी उपस्थित होते. या घटनेनंतर जिल्ह्यात सामाजिक आणि राजकीय वर्तुळात तीव्र संतापाची लाट उसळली असून, “संजय वैरागर यांना न्याय मिळाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही” अशी भूमिका रिपब्लिकन पक्षाने स्पष्ट केली आहे.

No comments