adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

रखडलेल्या पुलासाठी पहूरचे पत्रकार उतरले रस्त्यावर !

  रखडलेल्या पुलासाठी पहूरचे पत्रकार उतरले रस्त्यावर ! छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्ग तासभर रोखला ! शेकडो वाहनांच्या लागल्या रांगा ! मह...

 रखडलेल्या पुलासाठी पहूरचे पत्रकार उतरले रस्त्यावर !

छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्ग तासभर रोखला ! शेकडो वाहनांच्या लागल्या रांगा !

महिनाभरात पुलाचे काम पूर्ण करू - प्राधिकरण अभियंत्यांचे आश्वासन 


नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो :-: पहूर 

(संपादक :-: हेमकांत गायकवाड)

पहूर , ता . जामनेर ( ता . १२ ) खानदेश आणि मराठवाड्याला जोडणाऱ्या जळगांव -छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३ एफ वरील पहूर येथील वाघुर नदीच्या पुलाचे रखडलेले काम पूर्ण होण्यासाठी पहूर येथे चक्क पत्रकार बांधवच रस्त्यावर उतरले . तब्बल तासभर चाललेल्या रास्ता रोको आंदोलनामुळे चारही रस्त्यांवर शेकडो वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या . अखेर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण जालना विभागाचे अभियंता संदीप पाटील यांनी सदर पुलाचे काम महिनाभरात पूर्ण करतो असे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले .याप्रसंगी नायब तहसीलदार प्रशांत निंबोळकर आणि पोलीस निरीक्षक सचिन सानप यांना शहर पत्रकार संघटनेतर्फे महामार्ग संदर्भातील विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले .



        पहूर शहर पत्रकार संघटनेचे अध्यक्ष प्रवीण कुमावत यांच्या नेतृत्वाखाली ज्येष्ठ पत्रकार शांताराम बापू लाठे यांच्या मार्गदर्शनाखाली आज शुक्रवारी  ( ता . १२ ) सकाळी १० वाजता वाघुर नदी पुलावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले .प्रारंभी  याच पूल परिसरात रखडलेल्या पुलामुळे अपघातांमध्ये मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप स्वर्गीय अरुण मोरे , स्वर्गीय राहुल पावरे यांच्यासह प्रतिभावंत बालकवयित्री ज्ञानेश्वरी शंकर भामेरे या शाळकरी विद्यार्थिनीच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन करून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली . 



       याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार शांताराम लाठे , शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रवीण कुमावत , माजी अध्यक्ष गणेश पांढरे , रवींद्र घोलप , रवींद्र लाठे , शंकर भामेरे  आदी पत्रकार बांधवांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या . यावेळी जामनेर येथील पत्रकार  भानुदास चव्हाण ,  शांताराम झाल्टे , शेंदुर्णी येथील पत्रकार देवेंद्र पारळकर , पिंपळगांव येथील पत्रकार संतोष पांढरे ,   यांच्यासह सादिक शेख ,  कार्याध्यक्ष किरण जाधव , डॉ . संभाजी क्षीरसागर , जयंत जोशी ,  हरिभाऊ राऊत  आदी पत्रकार बांधव रस्त्यावर उतरले होते . 

  


महामार्ग प्रशासनाची लक्तरे वेशीवर . . .

पहूर गावचे भूमिपुत्र राज्य शासनाच्या 'मेरी ' चे सेवानिवृत्त अभियंता विजय पांढरे यांनी आंदोलनात सहभाग नोंदवून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची लक्तरेच वेशीवर टांगली . ते म्हणाले ' वेळेत काम पूर्ण करता येत नसेल तर ,तुम्ही अभियंत्यांनी जीव द्यावा , सिंचन घोटाळा जसा समोर आला , तसाच मोठा घोटाळा या राष्ट्रीय महामार्गांच्या कामांमध्ये देखील समोर येऊ शकतो . त्यांच्या ज्वलंत भावनांनी सारेच वातावरण संतप्त झाले होते .  



 अशा आहेत मागण्या . . .

शेकडो अपघातांना आणि ३ निष्पाप जीवांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या संबंधित ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा .


वाघुर नदीवरील पुलाचे रखडलेले काम पूर्ण करून सदर पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात यावा .


पुलावरील दोन्ही बाजूला रखडलेले काँक्रिटीकरण पूर्ण करून खड्ड्यांचा प्रश्न समोर निकाली काढावा .


पुलाच्या दोन्ही बाजूस लावलेले हायमास्ट लॅम्प सुरू करण्यात यावेत .


पूल परिसरात आवश्यक त्या ठिकाणी सुरक्षा कठडे बसविण्यात यावेत .


शाळा ,महाविद्यालय ,दवाखाना पोलीस स्टेशन आदी संवेदनशील सार्वजनिक ठिकाणी सूचना फलक लावण्यात यावेत .


बसस्थानक परिसरात गतिरोधक बसविण्यात यावे .


आवश्यक त्या ठिकाणी ट्रॅफिक सिग्नल बसविण्यात यावेत . 



तासभर महामार्ग रोखला ! 

पत्रकार बांधव रस्त्यावर उतरल्याने छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्ग तब्बल तासभर रोखल्या गेला . शेकडो वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने या सार्वजनिक सामाजिक विषयाबद्दलचे गांभीर्य प्रशासनाच्या ध्यानी आले .  कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पहूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन सानप ,पोलीस उपनिरीक्षक भरत दाते यांच्यासह पोलीस प्रशासनाने सहकार्य केले . याप्रसंगी गावातील सामान्य नागरिकांसह काही लोकप्रतिनिधी शाळकरी विद्यार्थी आणि विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते . 


ज्वलंत समस्या 


सदर पुलाचे काम रखडलेले असल्याने या मार्गावरून जाणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांना - विद्यार्थिनींना आपला जीव मुठीत धरून जावे लागत आहे . पहूर बस स्थानकापासून शेंदुर्णी रस्त्यावर आर .टी .लेले  हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय , मिल्लत उर्दू हायस्कूल , महावीर पब्लिक स्कूल , जिल्हा परिषद उर्दू शाळा  असून शेकडो विद्यार्थी विद्यार्थिनी याच पुलावरून ये -जा करतात . एकीकडे पादचारी पुल बंद आहे , तर दुसरीकडे नवीन पुलाचे काम रखडलेले आहे .यातच भर म्हणून की काय महामार्गाच्या दोन्ही बाजूंना जीव घेणे खड्डे आणि पावसाळा असल्याने  पुलावर साचलेली तळी , यामुळे पायी चालणाऱ्यांना जणू काही मृत्यूच सोबत घेऊन जात आहोत की काय ? असेच वाटते . 


        संबंधित ठेकेदार आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण शालेय विद्यार्थी आणि निरपराध नागरिकांच्या जीवाशी आणि भावनांशीच क्रूर खेळ खेळत असून तीन जीव गमावलेल्यांमध्ये  १ प्रतिभावंत बालकवीत्री ज्ञानेश्वरी शंकर भामेरे ही डॉ . हेडगेवार प्राथमिक विद्यालयाची पाचवीची विद्यार्थिनी होती . 

एकीकडे सरकार शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध योजना राबवत असताना दुसरीकडे मात्र शालेय विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आला आहे . याकडे शासन आणि प्रशासन जाणीवपूर्वक डोळेझाक करत आहे की काय ? असा प्रश्न समोर येत आहे . पहूर पुलाचा प्रश्न १ महिन्यात सोडवावा अन्यथा यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा प्रवीण कुमावत यांनी दिला आहे .  सामाजिक भावना तीव्र होऊन जनप्रक्षोभ उसळण्यापूर्वीच शासन आणि प्रशासनाने या ज्वलंत समस्येकडे लक्ष वेधून समस्या सोडवणे आवश्यक आहे .

No comments