वादग्रस्त गटशिक्षण अधिकाऱ्याला सक्तीच्या रजेवर पाठवा ; अन्यथा गटशिक्षण अधिकारी कार्यालयाला टाळे ठोकणार ..भीम आर्मीचा इशारा..... लातू...
वादग्रस्त गटशिक्षण अधिकाऱ्याला सक्तीच्या रजेवर पाठवा ; अन्यथा गटशिक्षण अधिकारी कार्यालयाला टाळे ठोकणार ..भीम आर्मीचा इशारा.....
लातूर.जि.प्र.(उत्तम माने)
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
निलंगा पंचायत समितीचे वादग्रस्त गटशिक्षणाधिकारी सुरेश गायकवाड यांना तत्काळ सक्तीच्या रजेवर पाठवून त्यांची खुल्या वातावरणात वरिष्ठ स्तरावर निःपक्ष चौकशी करून तत्काळ बडतर्फ करण्यात यावे अश्या आशयाचे निवेदन भीम आर्मी संघटनेच्या वतीने गटविकास अधिकारी सोपान अकेले यांना देण्यात आले आहे.
निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की,गटशिक्षण अधिकारी सुरेश गायकवाड यांच्या अनागोंदी व मनमानी कारभाराबद्दल भीम आर्मी व छावा संघटनेच्या वतीने महिना भरापूर्वी त्यांची उच्चस्तरीय खाते निहाय चौकशी करून त्यांना सेवेतुन तात्काळ बडतर्फ करणे,त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविणे इत्यादी मागण्या संदर्भात जिल्हाधिकारी,लातूर व मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. लातूर यांच्याकडे निवेदन देण्यात आलेले होते.
मात्र जवळपास एक महिना होत आला तरीही अद्याप ठोस कारवाई करण्यात आलेली नाही.
याविषयी कोणतीही लेखी माहिती पुरविण्यात आलेली नाही. त्यामुळे संबंधित गटशिक्षण अधिकारी निर्ढावलेले दिसून येत असून त्याचा विपरीत परिणाम शिक्षण विभागातील ग्रामीण भागात कार्यरत असणाऱ्या प्रामाणिक कर्मचाऱ्यावर अन्याय होत असून तालुक्यातील शिक्षणाचा व गुणवत्तेचा पुरता बोजवारा उडाला आहे. या त्यांच्या अनागोंदी कारभाराास सर्वस्वी गटशिक्षण अधिकारी सुरेश गायकवाड हेच जबाबदार आहेत. याबाबतचे ज्वलंत उदाहरण असे की,मौजे गुऱ्हाळ तालुका निलंगा येथील जिल्हा परिषद शाळेतील बेशिस्त गैरवर्तन असणारे शिक्षक सपकाळे पांडुरंग तुकाराम याची ते मागील तीन वर्षापासून पाठराखण करीत आहेत.त्याचप्रमाणे मर्जीतील शिक्षकांना सोयीच्या ठिकाणी नियमबाह्य पद्धतीने तात्पुरत्या नियुक्त्या देण्याचा सपाटा लावलेला आहे.
काही त्यांच्या मर्जीतील शिक्षकांना कार्यालयीन वेळेत अध्यापन सोडून विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडून स्वतःच्या कार्यालयात बोलावून घेऊन त्यांच्या सल्ल्याने कारभार हाकत आहेत.
यासह त्यांची असे अनेक उदाहरणे देता येतील असे कृत्य ते करीत असतात त्यामुळे जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत असून त्याची सर्वस्वी जबाबदारी गटशिक्षण अधिकाऱ्यावर निश्चित करण्यात यावी.
असे कृत्य असणारे गट शिक्षण अधिकारी यांचे चौकशी समितीचे काही लागे बांधे आहेत का ? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
संबंधित गट शिक्षण अधिकारी हे स्वतः वादग्रस्त असल्यामुळे स्वतःच्या बचावासाठी चौकशीचा बागलबुवा उभा करुन वरिष्ठ प्रशासनाची दिशाभूल करीत आहेत.
त्यामुळे निवेदन दिलेल्या तारखेपासून सात दिवसाच्या आत गटशिक्षण अधिकारी सुरेश गायकवाड यांना सक्तीच्या रजेवर पाठवून त्यांची कसून चौकशी करावी अन्यथा निवेदन दिल्याच्या तारखेच्या सात दिवसानंतर शिक्षण विभागाला टाळे ठोकण्यात येतील याची गांभीर्याने नोंद घेण्यात यावी असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.
निवेदनावर तालुका अध्यक्ष अतुल सोनकांबळे,तालुका उपाध्यक्ष राज लोखंडे,अनिल सुरवसे, किशोर सुरवसे,अर्जुन जाधव,बालाजी सुरवसे, दिगंबर सूर्यवंशी,प्रथमेश सूर्यवंशी,बालाजी सुरवसे (चांदोरीकर), करण जाधव,मनोज कांबळे,बालाजी सोनटक्के,निखिल कांबळे,अजित कांबळे,यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

No comments