adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

अंधार कोठडीतील नरक यातनांमधून सहा वर्षांनी प्रभुजी मुक्त..स्नेहश्रद्धा प्रकल्पामुळे मिळाले नवजीवन..

  अंधार कोठडीतील नरक यातनांमधून सहा वर्षांनी प्रभुजी मुक्त..स्नेहश्रद्धा प्रकल्पामुळे मिळाले नवजीवन..  सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -:- हेम...

 अंधार कोठडीतील नरक यातनांमधून सहा वर्षांनी प्रभुजी मुक्त..स्नेहश्रद्धा प्रकल्पामुळे मिळाले नवजीवन.. 


सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अहिल्यानगर (२१):-उच्चशिक्षित 35 वर्षांच्या तरुण प्रभुजीच्या ( ईश्वर स्वरूप असलेला मानसिक आजारी व्यक्ती ) कुटुंबीयांनीच त्याला सहा वर्षांपूर्वी एका लहानशा अंधार कोठडीत कोंडले.स्नेहश्रद्धा प्रकल्पामुळे नरक यातनांमधून जीवंत मुक्त झालेल्या प्रभुजीला स्नेहश्रद्धा टीमच्या तत्पर कृतीने आजपासून नवजीवन मिळाले आहे. हंडाळवाडी ता. पाथर्डी ) येथील या हादरवून टाकणाऱ्या घटनेमुळे मनोरुग्णांच्या दुर्दशेकडे देशाचे लक्ष वेधले गेले आहे.

निवृत्त पोलीस निरीक्षक लक्ष्मण हंडाळ यांनी मागील आठवड्यात मानसग्राम या मानसिक आरोग्य उपक्रमातील स्नेहश्रद्धा प्रकल्पाला या घटनेबाबत माहिती दिली.या उपक्रमाचे मानद संचालक मानसोपचार तज्ञ डॉ.नीरज करंदीकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभुजीसाठी एक मुक्तीयोजना आखण्यात आली.हंडाळवाडीत पोहोचल्यावर स्नेहश्रद्धा टीमने पाहिले की, सुमारे 70 चौरस फुटांच्या अंधार कोठडीला पाडलेल्या लहान छिद्रातून जमेल तसे अन्न आणि प्लास्टिकच्या बाटलीतून पाणी प्रभुजीला मागील सहा वर्षांपासून टाकले जात होते.दरवाजाला मोठे कुलूप ठोकून बंद केलेल्या काळ कोठडीला खिडकी देखील नव्हती.बाहेरचा प्रकाश, हवा, पाऊस, निसर्ग आणि सर्व जगाशी प्रभुजीचे नाते पूर्णतः तुटले होते. दिवस आणि रात्रीचे देखील त्याला भान उरले नव्हते.या काळात प्रभुजीचे आई-वडील - 3 भाऊ- अन्य नातेवाईक, मित्र किंवा कोणीही त्यास अक्षरशः एकदाही भेटले नाही. कोठडीतील नीरव शांततेत रातकिड्यांचे आवाज वगळता एकही मानवी शब्द प्रभुजीने कधी ऐकला नाही. येथे वीज, दिवा, फॅन,संडास, बाथरूम, अंथरूण, पांघरूण असले काहीही नव्हते.

या कोठडी वरील छिद्रातून प्रभुजीला स्नेहश्रद्धा टीमने खूप हाका मारल्या. परंतु त्या हाकेला प्रतिसाद देण्याचे त्राण देखील प्रभुजीत उरले नव्हते.कोठडीच्या आजूबाजूला खांद्या एवढे गवत वाढले होते. प्रचंड दुर्गंधी येत होती. कचरा जमली होती.सहा वर्षांपूर्वी लावलेल्या भल्या मोठ्या कुलपाची चावी प्रभुजीच्या घरच्यांकडून हरवली होती. त्यामुळे दगडाने दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश करावा लागला. नग्न प्रभुजी गलितगात्र होऊन जमिनीवर पडला होता. कोठडीत प्रभुजी स्वतःच्याच साचलेल्या मलमूत्रात जेवत आणि झोपत होता. आसपास प्लास्टिक बाटल्या - अन्नाच्या कॅरीबॅग - सडलेले जेवण यांचा भीषण दुर्गंध आणि प्रचंड कचरा साचला. होता . प्रभुजी माणूस वाटतच नव्हता. मलमूत्राने माखलेले शरीर, डोक्यात केसांच्या झालेल्या जटा, लांब वाढलेली दाढी, अंगात नसलेला एकही कपडा उभे राहण्याचे देखील बसलेले त्राण अशा प्रभुजीची अवस्था होती. प्रभुजीला स्वच्छ करून, कपडे घालून बाहेर आणले तेव्हा त्याने आकाशाकडे पहात हात जोडले . काळकोठडीतून जीवंत बाहेर काढल्याबद्दल परमेश्वराचे आभार मानले.

खर्चिक मानसोपचार

प्रभुजीच्या कुटुंबीयांनी सांगितले की, बालपणापासूनच प्रभुजी हा त्याच्या शाळेतील सर्वात हुशार विद्यार्थी होता.बीएससी पर्यंतचे शिक्षण प्रभुजीने अव्वल दर्जाने पूर्ण केले.सुस्वभावी असणारा प्रभुजी त्यानंतर मानसिक आजाराच्या विळख्यात अडकला.कुटुंबाची आर्थिक दुर्बलता आणि मानसोपचार तज्ञाची ग्रामीण भागातील अनुपलब्धता यामुळे त्याचा आजार विकोपाला गेला.उपचारांचे सर्व मार्ग बंद झाल्याने कुटुंबाने प्रभुजीला काही महिने येरवडा ( पुणे) येथील प्रादेशिक मानसिक उपचार रुग्णालयात त्यास ठेवले.परंतु नियमानुसार प्रभुजीला परत त्याच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले. मानसिक आजाराची तीव्रता वाढल्यावर कुटुंबीयांनी त्याला निरूपायाने सहा वर्षांपूर्वी कोठडीत बंदिस्त केले. कोठडीला पाडलेल्या छिद्रातून अन्न आणि पाणी देऊन ते आपली आस्था व्यक्त करीत होते.प्रभुजीला काल स्नेहालय संस्थेच्या इसळक ( ता. जि. अहिल्यानगर ) येथील मानसग्राम या मानसिक आरोग्याला समर्पित असलेल्या संकुलातील स्नेहश्रद्धा पुनर्वसन केंद्रात आणण्यात आले. येथे त्यावर सर्वांगीण उपचार करून त्याचे कौटुंबिक पुनर्वसन केले जाणार आहे.प्रभुजीला नवजीवन देण्यात मानसग्रामच्या सल्लागार क्लीनिकल सायकॉलॉजिस्ट सौ. दीप्ती करंदीकर, स्नेहश्रद्धा टीम मधील सोनाली साळवे, सोनू शहा, अमेय पुंड, गणेश धारकर, भारत तिडके, समीक्षा पवार, निकिता उंडे, वेणू आंग्रे,परी सूर्यवंशी ,प्रकल्प व्यवस्थापक रमाकांत डोड्डी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

700 रुग्णांना नवजीवन


रॅमन मॅगसेसे पुरस्कार प्राप्त मानसोपचार तज्ञ आणि श्रद्धा रिहबिलिटेशन सेंटरचे संस्थापक डॉ.भरत वटवानी यांच्या प्रेरणेतून मानसिक आरोग्याचे काम स्नेहालयाने सुरू केले. त्यासाठी येथील करंदीकर मानसोपचार रुग्णालयाने वर्ष 2020 पासून निरपेक्ष सहयोग दिला.मानसिक आरोग्य क्षेत्रातील बहुउद्देशीय मानसग्राम उपक्रमांतर्गत स्नेहश्रद्धा हा प्रकल्प राबविला जातो. भारतातील रस्त्यांवर भटकणाऱ्या बेवारस मनोरुग्णांना प्रकल्पात आणून आधार आणि उपचार दिले जातात. त्यानंतर त्यांचे कौटुंबिक पुनर्वसन करून काही वर्ष त्यांना मानसिक आजारावरील औषधे मोफत पुरविली जातात.आतापर्यंत सुमारे 700 मनोरुग्णांचे जीवन या उपक्रमाने बदलले. भारताच्या विविध राज्यांसह नेपाळ , बांगलादेश इ.शेजारी देशातही रुग्णांना बरे करून त्यांचे कौटुंबिक पुनर्मिलन करण्यात आले.

कुठल्याही रस्त्यांवर बेवारस मनोरुग्ण आढळल्यास स्नेहश्रद्धा प्रकल्पाशी 9011011006 या मोबाईल क्रमांकावर संपर्काचे आवाहन प्रकल्पाद्वारे करण्यात आले आहे.

No comments