*चोपडा पालिकेचा ‘अॅक्शन मोड’: दोन दिवसांत १३० नळ कनेक्शन कापले; थकबाकीदारांचे धाबे दणाणले* चोपडा प्रतिनिधी :- (संपादक :- हेमकांत गायकवाड) ...
*चोपडा पालिकेचा ‘अॅक्शन मोड’: दोन दिवसांत १३० नळ कनेक्शन कापले; थकबाकीदारांचे धाबे दणाणले*
चोपडा प्रतिनिधी :-
(संपादक :- हेमकांत गायकवाड)
शहरातील घरपट्टी व पाणीपट्टीच्या थकबाकी वसुलीसाठी चोपडा नगरपरिषद आता पूर्णपणे ‘अॅक्शन मोड’मध्ये आली आहे. वारंवार सूचना देऊनही कर न भरणाऱ्या नागरिकांविरोधात प्रशासनाने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली असून, विशेष वसुली मोहिमेत गेल्या दोन दिवसांत तब्बल १३० हून अधिक थकबाकीदारांचे पाणी नळ कनेक्शन खंडित करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे शहरातील थकबाकीदारांमध्ये मोठी खळबळ उडाली असून अनेकांनी तातडीने थकबाकी भरण्यास सुरुवात केली आहे.
नगरपरिषदेकडून गेल्या काही महिन्यांपासून विविध माध्यमांतून थकबाकीदारांना वारंवार सूचना देण्यात येत होत्या. बॅनर, रिक्षाद्वारे घोषणाबाजी, घंटागाडी आणि नोटिसा देऊन नागरिकांना कर भरण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्याने अखेर प्रशासनाने प्रत्यक्ष कारवाईचा मार्ग अवलंबला आहे.
दोन दिवसांत धडाकेबाज कारवाई
नगरपरिषदेच्या वसुली पथकाने नियोजनबद्ध पद्धतीने शहरातील विविध भागांमध्ये मोहीम राबवली. पहिल्याच दिवशी कारवाईचा जोरदार प्रारंभ करण्यात आला.
पहिला दिवस:
बोरोले १, महालक्ष्मी नगर आणि पंकज नगर परिसरात पथकाने घराघरांपर्यंत जाऊन थकबाकीदारांची तपासणी केली. वारंवार सूचना देऊनही पाणीपट्टी न भरलेल्या नागरिकांचे नळ कनेक्शन तत्काळ खंडित करण्यात आले.
दुसरा दिवस:
दुसऱ्या दिवशी मोहिमेचा विस्तार करत प्रशासनाने भोकर वाडा, मोमीन गल्ली, कुंभार वाडा, बारी वाडा, समता नगर, गुजराथी गल्ली, तेली वाडा आणि गोल मंदिर परिसरात कारवाई केली. या भागात अनेक वर्षांपासून पाणीपट्टी थकवलेल्या ग्राहकांवर पथकाने थेट नळ कनेक्शन बंद करण्याची कारवाई केली.
या सलग कारवाईमुळे अनेक नागरिकांनी तातडीने नगरपरिषद कार्यालयात धाव घेऊन थकबाकी भरून कनेक्शन पुन्हा सुरू करण्यासाठी अर्ज केले.
पाणीपट्टीकडे दुर्लक्ष; पालिकेवर आर्थिक ताण
नगरपरिषद प्रशासनाच्या माहितीनुसार, शहरात घरपट्टी काही प्रमाणात भरली जात असली तरी पाणीपट्टी भरण्याकडे अनेक नागरिक जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे आढळून आले आहे. परिणामी नगरपरिषदेला मोठ्या आर्थिक ताणाचा सामना करावा लागत आहे.
शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी दरमहा मोठ्या प्रमाणात खर्च होतो. पाणी शुद्धीकरण प्रक्रिया, मोटार पंपांचे वीज बिल, देखभाल आणि पाइपलाइन दुरुस्ती यासाठी लाखो रुपयांचा खर्च होतो. पाणीपट्टीची वसुली न झाल्यास ही संपूर्ण व्यवस्था चालवणे कठीण होऊ शकते, अशी चिंता प्रशासनाने व्यक्त केली आहे.
कारवाईदरम्यान वाद; प्रशासन ठाम
वसुली पथक नागरिकांच्या दारात पोहोचताच काही ठिकाणी वादाचे प्रसंगही घडत असल्याचे दिसून आले. काही नागरिकांनी कारवाईला विरोध करत ‘आमची हेतुपुरस्सर बदनामी केली जात आहे’ असा आरोप केला. तर काहींनी लोकप्रतिनिधींकडे जाऊन ‘मुदत दिली नाही’ असा कांगावा करण्याचाही प्रयत्न केला.
मात्र प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, ज्या नागरिकांनी पथकाकडे लेखी अर्ज करून मुदत मागितली आहे त्यांनाच लोकप्रतिनिधींच्या मध्यस्थीने २ ते ७ दिवसांचा अवधी दिला जात आहे. अन्यथा नियमांनुसार कारवाई करण्यात येणार आहे. आरडाओरड करून किंवा दबाव टाकून कारवाई थांबवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना आता कुठलीही सवलत दिली जाणार नसल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले.
थकबाकीदारांवर पुढील टप्प्यात जप्तीची कारवाई
या मोहिमेबाबत बोलताना रामनिवास झंवर, मुख्याधिकारी, यांनी सांगितले की शहरातील सुमारे १८०० पाणीपट्टी आणि ६०० घरपट्टी थकबाकीदार प्रशासनाच्या रडारवर आहेत.
त्यांनी सांगितले की,
“नगरपरिषदेकडून नागरिकांना अनेक वेळा सूचना देण्यात आल्या आहेत. तरीही कर न भरणाऱ्यांवर आता कठोर कारवाई सुरू करण्यात आली आहे. ही मोहीम ३१ मार्चपर्यंत आणि त्यानंतरही सातत्याने सुरू राहणार आहे. गरज पडल्यास पुढील टप्प्यात थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्तीची प्रक्रिया देखील सुरू करण्यात येईल.”
नागरिकांना प्रशासनाचे आवाहन
नगरपरिषद प्रशासनाने शहरातील नागरिकांना आवाहन केले आहे की, आपली सामाजिक प्रतिष्ठा जपण्यासाठी आणि शहराचा विकास थांबू नये यासाठी घरपट्टी व पाणीपट्टीची थकबाकी तातडीने भरावी. अन्यथा पुढील काही दिवसांत शहरातील इतर भागांतही अशाच प्रकारची कारवाई तीव्र करण्यात येणार आहे...




No comments