विजेच्या तारांवर झाडे पडल्याने वाढला धोका; तातडीने उपाययोजना करण्याची मागणी – नगरसेवक तथा विरोधी पक्षनेते गजेंद्र जयस्वाल चोपडा प्रतिनिधी ...
विजेच्या तारांवर झाडे पडल्याने वाढला धोका; तातडीने उपाययोजना करण्याची मागणी – नगरसेवक तथा विरोधी पक्षनेते गजेंद्र जयस्वाल
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा शहरात काल झालेल्या अवकाळी पावसाने व अतिवृष्टीने मोठा फटका बसला असून अनेक ठिकाणी मोठमोठी झाडे उन्मळून रस्त्यावर पडल्याची घटना घडली आहे. काही ठिकाणी ही झाडे थेट विजेच्या खांबांवर व तारांवर कोसळल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
झाडे रस्त्यावर पडल्यामुळे शहरातील विविध भागांमध्ये वाहतुकीस अडथळा निर्माण झाला असून नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. तसेच विजेच्या तारांवर झाडे पडल्याने वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. परिणामी नागरिकांना अंधारात राहण्याची वेळ येत असून दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. यासोबत नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या समस्यांनाही सामोरे जावे लागत आहे
या पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष नेते तथा नगरसेवक गजेंद्र जयस्वाल यांनी चोपडा नगरपालिकेने तात्काळ कारवाई करून रस्त्यावर पडलेली झाडे हटवावीत, तसेच विजेच्या खांबांवर व तारांवर पडलेली झाडे त्वरित दूर करावीत, अशी मागणी केली आहे.
यासोबतच येणाऱ्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर अशा घटना टाळण्यासाठी एमएसईबी वीज वितरण कंपनी व नगरपालिका यांनी संयुक्तपणे शहरातील रस्त्यांलगतच्या झाडांची पाहणी करून विजेच्या तारांजवळील धोकादायक फांद्यांची छाटणी करावी, अशीही त्यांनी मागणी केली आहे.
नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अत्यंत गंभीर असल्याने प्रशासनाने विलंब न करता तातडीने उपाययोजना कराव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही गजेंद्र जयस्वाल यांनी दिला आहे.

No comments