अहिल्यानगरमध्ये साहित्याचा गंध दरवळणार..१७ व्या शब्दगंध संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी नगरसेवक सुरेश बनसोडे.. शिव-शाहू-फुले-आंबेडकरी विचारांच...
अहिल्यानगरमध्ये साहित्याचा गंध दरवळणार..१७ व्या शब्दगंध संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी नगरसेवक सुरेश बनसोडे.. शिव-शाहू-फुले-आंबेडकरी विचारांच्या नेतृत्वाकडे संमेलनाचे सारथ्य.
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर:- साहित्य क्षेत्रातील मानाचे मानले जाणारे १७ वे राज्यस्तरीय 'शब्दगंध' साहित्य संमेलन येत्या २३ व २४ मे रोजी अहिल्यानगरमध्ये रंगणार आहे. या संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष आणि नगरसेवक सुरेशभाऊ बनसोडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.आमदार संग्राम जगताप यांच्या जनसंपर्क कार्यालयात पार पडलेल्या महत्वपूर्ण बैठकीत ही घोषणा करण्यात आली.या निवडीमुळे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील एका धडाडीच्या नेतृत्वाकडे साहित्याचा वारसा जोपासण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.ज्येष्ठ साहित्यिक प्रा.डॉ.संदीप सांगळे यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन जाधव लॉन्स,कल्याण रोड, अहिल्यानगर येथे होईल.शब्दगंध परिषदेचे अध्यक्ष राजेंद्र उदागे आणि कार्याध्यक्ष ज्ञानदेव पांडुळे यांच्या उपस्थितीत ही निवड जाहीर झाली.सुरेश बनसोडे यांची ओळख केवळ एक नगरसेवक म्हणून नसून, शिव-शाहू-फुले-आंबेडकरी विचारांचे पाईक म्हणून ते सुपरिचित आहेत.माळीवाडा येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे.तसेच,सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनातील त्यांचा प्रदीर्घ अनुभव संमेलनाच्या यशस्वीतेसाठी मोलाचा ठरणार आहे.१७ वे शब्दगंध साहित्य संमेलन अत्यंत दिमाखदार पद्धतीने पार पाडण्यासाठी मी कटिबद्ध आहे.दिग्गज साहित्यिकांसोबतच नवोदित लेखकांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट असेल असे यावेळी नगरसेवक सुरेश बनसोडे म्हणाले.निवडीनंतर सुरेश बनसोडे यांचा शब्दगंध परिषदेच्या वतीने शाल, पुष्पगुच्छ आणि ग्रंथ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. या बैठकीस राज्य कार्यकारिणीचे सुभाष सोनवणे,प्रा.डॉ.तुकाराम गोंदकर,सुनील गोसावी,भगवान राऊत,प्रा.डॉ.अनिल गर्जे, बबनराव गिरी,आणि महिला प्रतिनिधीं मध्ये शर्मिला गोसावी, स्वाती ठुबे,सुरेखा घोलप आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाची रूपरेषा बैठकीचे प्रास्ताविक सुभाष सोनवणे यांनी केले,तर भगवान राऊत यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वाती ठुबे यांनी केले आणि आभार प्रदर्शन प्रा. डॉ.अनिल गर्जे यांनी मानले.या संमेलनामुळे अहिल्यानगरमध्ये पुन्हा एकदा साहित्याची मोठी जत्रा भरून सांस्कृतिक चैतन्य निर्माण होणार आहे.

No comments