मौजे धावडे परिसरातुन अवैध वाळू उपशामुळे धावडे ग्रामस्थ संतप्त; तहसीलदारांकडे ग्रामस्थांची व सरपंचाची तक्रार दाखल ग्रामस्थ त्रस्त अधिकारी स...
मौजे धावडे परिसरातुन अवैध वाळू उपशामुळे धावडे ग्रामस्थ संतप्त; तहसीलदारांकडे ग्रामस्थांची व सरपंचाची तक्रार दाखल
ग्रामस्थ त्रस्त अधिकारी सुस्थ, कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा ग्रामस्थांचा इशारा
अमळनेर प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अमळनेर : तालुक्यातील मौजे धावडे परिसरात तापी नदीपात्रातून सुरू असलेल्या कथित अवैध वाळू उत्खननामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.यासंदर्भात सरपंच व उपसरपंच यांनी तहसीलदार, अमळनेर यांच्याकडे लेखी निवेदन सादर करून तातडीने कारवाईची मागणी केली आहे.
निवेदनानुसार, काही वाळू माफियांनी रात्रीच्या वेळी नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर वाळूचा उपसा सुरू ठेवला असून ट्रॅक्टर व इतर वाहनांच्या माध्यमातून वाळूची वाहतूक केली जात आहे.या अवैध प्रकारामुळे नदीपात्राची नैसर्गिक रचना धोक्यात आली असून परिसरातील शेती व पर्यावरणावर गंभीर परिणाम होत असल्याचा आरोप सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थांनी केला आहे.
तसेच जड वाहनांच्या सततच्या वाहतुकीमुळे गावातील अंतर्गत रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर हानी होत आहे. धुळीचे प्रमाण वाढल्याने नागरिकांच्या. आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला असून रात्रीच्या वेळी होणाऱ्या वाहनांच्या आवाजामुळे ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
सरपंचानी प्रशासनाकडे अवैध वाळू उपसा तात्काळ बंद करून संबंधितांवर महसूल व पर्यावरण नियमांनुसार कठोर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच भविष्यात अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी नियमित गस्त व नियंत्रण मोहीम राबविण्याची मागणीही करण्यात आली आहे.
दरम्यान, या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन प्रशासनाने चौकशी सुरू करावी, अन्यथा ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.


No comments