महसूल मंत्र्यांच्या निर्देशानंतर तत्कालीन तहसीलदार गणेश माळी यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई आरटीआय कार्यकर्ते महादेव साठे यांच्या तक्रारीची श...
महसूल मंत्र्यांच्या निर्देशानंतर तत्कालीन तहसीलदार गणेश माळी यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई
आरटीआय कार्यकर्ते महादेव साठे यांच्या तक्रारीची शासनस्तरावर दखल; महसूल व वन विभागाकडून समज व सक्त ताकीद
अहिल्यानगर प्रतिनिधी
(संपादक : हेमकांत गायकवाड)
आरटीआय कार्यकर्ते महादेव अरुण साठे यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेत महसूल मंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांच्या निर्देशानंतर महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई यांनी तत्कालीन तहसीलदार, जामखेड गणेश माळी यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली आहे.
महादेव साठे यांनी तत्कालीन तहसीलदार गणेश माळी यांनी महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९ मधील तरतुदींचे उल्लंघन केल्याप्रकरणी महसूल व वन विभागाकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल महसूल मंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांनी घेत संबंधित प्रकरणात योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश महसूल व वन विभागाला दिले होते.
यानंतर मंत्रालय स्तरावर या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान तत्कालीन तहसीलदार, जामखेड तथा सध्या तहसीलदार, धानोरा (जि. गडचिरोली) म्हणून कार्यरत असलेले गणेश माळी यांनी शासनाच्या पदस्थापना आदेशानुसार विहित मुदतीत नव्या पदस्थापनेच्या ठिकाणी रुजू न झाल्याचे निदर्शनास आले.
या प्रकाराची गंभीर दखल घेत महसूल व वन विभागाचे अवर सचिव प्रविण पाटील यांनी महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम, १९८१ मधील तरतुदीनुसार संबंधित अधिकाऱ्यावर कार्यवाही केली. तसेच भविष्यात अशा प्रकारची पुनरावृत्ती होणार नाही, याबाबत समज देत सक्त ताकीदही बजावण्यात आली आहे.
या कारवाईमुळे शासनाचे नियम सर्वांसाठी समान असून अधिकारी असो वा कर्मचारी, नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावरही कारवाई होऊ शकते, हे स्पष्ट झाल्याचे मत आरटीआय कार्यकर्ते महादेव अरुण साठे यांनी व्यक्त केले. तसेच नागरिकांनी केलेल्या तक्रारींची शासन स्तरावर गांभीर्याने दखल घेतली जाते, याचे हे एक उदाहरण असल्याचेही त्यांनी सांगितले.

No comments