adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

महाराष्ट्राने गमावलेल एक अष्टपैलू व्यक्तीमत्त्व अजितदादा पवार.

  महाराष्ट्राने गमावलेल एक अष्टपैलू व्यक्तीमत्त्व अजितदादा पवार.    लातूर, जि. प्र. (उत्तम माने ) आज २२ जुलै, महाराष्ट्राच्या राजकारणातील वा...

 महाराष्ट्राने गमावलेल एक अष्टपैलू व्यक्तीमत्त्व अजितदादा पवार. 


  लातूर, जि. प्र. (उत्तम माने )

आज २२ जुलै, महाराष्ट्राच्या राजकारणातील वादळी व्यक्तिमत्व, महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांची जयंती. अजित दादांची जयंती हा शब्द लिहिण्यासाठी लेखणी धजावत नाही कारण २२ जुलैला दादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याची सवय या लेखणीला लागली आहे. दादांच्या जयंती निमित्त लेख लिहावा लागेल असे कधी वाटले नव्हते कारण २२ जुलै रोजी दादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याची सवय या लेखणीला लागली आहे. असो काही गोष्टी आपल्या हातात नसतात. नियतीपुढे कोणाचे काही चालत नाही. अजितदादा म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातील वादळी व्यक्तिमत्व. महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक नेते होऊन गेले. त्यातील काही नेते त्यांच्या नेतृत्वासाठी, काही नेते त्यांच्या कर्तृत्वासाठी, काही नेते त्यांच्या वक्तृत्वासाठी, काही नेते जनसंपर्कासाठी तर काही नेते प्रशासनावर असलेल्या पकडीसाठी ओळखले जातात. पण अजितदादा हे महाराष्ट्रातील असे एकमेव नेते होते की जे यासर्वांसाठी ओळखले जात होते. अजितदादा म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक वादळ होते. चार दशकांहून अधिक काळ आपल्या कर्तृत्वाने महाराष्ट्राच्या राजकारणावर ठसा उमटवणारा हा वाघ नागरिकांना कायमचा सोडून जरी गेला असला तरी आपल्या कार्याने त्यांनी नागरिकांच्या मनावर जो ठसा उमटवला तो कधीही पुसला जाणार नाही. दादा म्हणजे कामाचा माणूस. दादाकडे गेले की काम होणारच असा विश्वास लोकांना असायचा. काम होण्यायोग्य असेल तर लगेच करणारा आणि होण्यायोग्य नसेल तर तोंडावर नाही म्हणणारा. पोटात एक आणि ओठात एक असे राजकारणी दादा नव्हते जे पोटात आहे तेच बोलणारा आणि तेच करणारा. कडक शिस्तीचा पण तितकाच दिलदार मनाचा. मिश्किल, सुस्वभावी मनात येईल ते पटकन बोलून टाकणारा. बोलताना कशाचीही तमा न बाळगणारा पण आपण बोलल्याने कोणाचे मन दुखावले गेले हे लक्षात येताच जाहीर दिलगिरी व्यक्त करणारा आणि त्यासाठी जाहीर प्रायश्चित घेणारा, स्वतः वेळेचे बंधन पाळणारा आणि इतरांना वेळेचे महत्व पटवून देणारा. तरुणांना निर्व्यवसनी राहण्याचा सल्ला देणारा, चुकीला चूक आणि बरोबर असेल तर बरोबर म्हणणारा, कार्यकर्ता असो की नेता, स्वपक्षातील असो की विरोधातील चुकीचे वागत असेल तर त्याला वडिलकीच्या नात्याने खडसावणारा आणि त्याच नात्याने त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा, सतत सत्तेत राहूनही विरोधी पक्षांशी मैत्रीचे संबंध जपणारा, सकाळी सहा वाजता कामाला सुरुवात करणारा आणि ते काम दर्जेदार व्हावे असा हट्ट धरणारा, केवळ आणि केवळ महाराष्ट्राचा विकास हेच डोक्यात असणारा आणि त्यासाठी दिवसाचा रात्र करणारा, भाजप, शिवसेनेसारख्या हिंदुत्ववादी पक्षाशी हातमिळवणी करून सत्ता स्थापन करणारा तरीही शिव, ,शाहू, फुले आंबेडकरांचा पुरोगामी विचार न सोडणारा, त्या विचारांशीच एकनिष्ठ राहणारा, कुटुंब आणि राजकारण यांची योग्य सांगड घालणारा, कुटुंबात राजकारण आणि राजकारणात कुटुंब येऊ न देणारा दादा म्हणजे राजकारणातील वेगळेच रसायन होते. प्रत्येक गाव खेड्यातील कार्यकर्त्याला दादा म्हणजे आपला नेता वाटत होता. जवळपास चार दशकांहून अधिक काळ महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी राहिलेल्या अजित पवार यांचा जन्म २२ जुलै १९५९ रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे त्यांच्या आजोळी झाला. अजित पवार यांचे शालेय शिक्षण देवळाली प्रवरा येथेच झाले. त्यानंतर ते मुंबईत त्यांचे काका शरद पवार यांच्याकडे दहावी नंतरच्या शिक्षणासाठी आले. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून दादांनी बारामती गाठली आणि बारामतीतील सहकारी संस्थांच्या माध्यमातून सामाजिक कार्याला सुरुवात केली. दादांच्या राजकीय जीवनाची सुरुवात १९८१- ८२ साली छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणून झाली. भारतीय राजकारणातले द्रष्टे नेते काका शरद पवार यांनी त्यांच्यातील नेतृत्व गुण हेरून त्यांना राजकारणात आणले. १९९१ साली आपल्या नेतृत्व गुणाची चुणूक दाखवून दादांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत सत्तांतर घडवून आणले. त्याच वर्षी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यावर देखील आपले वर्चस्व मिळवले. दादांच्या नेतृत्व गुणाची पारख झाल्याने १९९१ साली शरद पवारांनी दादांना थेट खासदारकीची संधी दिली. खासदार म्हणून मोठ्या मताधिक्याने जिंकून आलेल्या दादांनी काकांसाठीच खासदारकीचा राजीनामा देऊन बारामतीत आमदारकी लढवली तेव्हापासून कामाच्या आणि लोकसंपर्काच्या जोरावर दादा बारामती तालुक्यातून सलग आठ वेळा विक्रमी मतांनी आमदार म्हणून निवडून आले. १९९१ साली पहिल्यांदाच आमदार झालेल्या दादांना सुधाकरराव नाईक यांनी आपल्या मंत्रिमंडळात घेतले आणि कृषी, फलोत्पादन आणि ऊर्जा खात्याचे राज्यमंत्रीपद दिले. १९९९ नंतर त्यांनी ग्रामविकास, पाणीपुरवठा, स्वच्छता ही मंत्रिपदे सांभाळी. जलसंपदा हे खातेही २०१० पर्यंत त्यांच्याकडेच होते. अर्थमंत्री म्हणून तर त्यांनी विक्रम केला. महाराष्ट्राचे अर्थमंत्रिपद त्यांनी सर्वाधिक काळ भूषवले. दादांनी सहा वेळा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्याचा विक्रम केला. सहा वेळा उपमुख्यमंत्रीपद भूषवणारे दादा हे देशातील एकमेव राजकीय नेते असतील. दरम्यानच्या काळात त्यांच्या गळ्यात विरोधी पक्षनेत्याची माळही पडली. १९९९ साली शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्यावर राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्ह घरोघरी पोहचवण्यासाठी त्यांनी जीवाचे रान केले. शरद पवार दिल्लीचे राजकारण करत असल्याने महाराष्ट्रातील राष्ट्रवादीची धुरा त्यांच्याच खांद्यावर होती. त्यांच्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसला कायम सत्तेत राहता आले. दादांची जशी राजकारणार पकड होती तशीच पकड त्यांची कला, क्रीडा, साहित्य, सहकार, शिक्षण, जलसिंचन या क्षेत्रावर देखील होती. प्रत्येक क्षेत्राचा बारकाईने अभ्यास करून त्यात सर्वोत्तम देणारा अजित पवारांसारखा दुसरा नेता नाही. त्यांचा इतका कामाचा झपाटा असणारा नेता पुन्हा होणार नाही. अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राची कधीही न भरून निघणारी हानी झाली आहे. त्यांचा सारखा नेता पुन्हा होणार नाही. त्यांच्या निधनाने राजकारणातील ‘ दादा’ पर्व संपले असे म्हंटले तर वावगे ठरणार नाही. धडाडीचे लोकनेते असणारे सर्वांचे लाडके अजितदादा पवार यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!

No comments