adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

प्रवेश परीक्षांचे वाढते जाळे: विद्यार्थ्यांच्या भविष्याचा पाया की मानसिकतेवरील घाव?

  प्रवेश परीक्षांचे वाढते जाळे: विद्यार्थ्यांच्या भविष्याचा पाया की मानसिकतेवरील घाव?  प्रतिनिधी जावेद शेख / राहूरी: (संपादक -:- हेमकांत गाय...

 प्रवेश परीक्षांचे वाढते जाळे: विद्यार्थ्यांच्या भविष्याचा पाया की मानसिकतेवरील घाव? 


प्रतिनिधी जावेद शेख / राहूरी:

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

राज्यात आणि देशात विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा (Entrance Exams) घेण्याची पद्धत दिवसेंदिवस वाढत आहे. गुणवत्तापूर्ण विद्यार्थ्यांची निवड हा या परीक्षांचा उद्देश असला, तरी आज त्याचे गंभीर सामाजिक, शैक्षणिक आणि मानसिक परिणाम दिसून येत आहेत. शिक्षण हा विकासाचा मार्ग असताना तो स्पर्धेच्या अतिरेकात अडकत चालल्याची चिंता व्यक्त होत आहे.

प्रवेश परीक्षांमुळे खासगी क्लासेसचे प्रचंड जाळे निर्माण झाले आहे. आर्थिकदृष्ट्या सक्षम कुटुंबे लाखो रुपये खर्च करून विद्यार्थ्यांना क्लासेसमध्ये पाठवतात; मात्र ग्रामीण, आदिवासी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांतील विद्यार्थ्यांना समान संधी मिळत नाही. परिणामी, शिक्षणात समानतेचे तत्त्व धोक्यात येत आहे.

याचबरोबर पालकांच्या वाढत्या अपेक्षा, गुणांची शर्यत आणि यश मिळवण्याचा प्रचंड ताण यामुळे विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. नैराश्य, चिंता, आत्मविश्वासाचा अभाव आणि सततची असुरक्षितता ही अनेक विद्यार्थ्यांची वास्तवता बनली आहे. शिक्षण आनंददायी राहण्याऐवजी तणावाचे कारण बनत आहे.

प्रवेश परीक्षांवर आधारित व्यवस्था वाढत असताना शाळा आणि महाविद्यालयांच्या नियमित शिक्षणाचे महत्त्व कमी होत आहे. विद्यार्थ्यांचा भर अभ्यासक्रमापेक्षा क्लासेसच्या नोट्स आणि परीक्षा तंत्रावर राहतो. त्यामुळे शिक्षक, शाळा आणि महाविद्यालयांची शैक्षणिक भूमिका दुय्यम ठरत आहे. ही स्थिती शिक्षण व्यवस्थेसाठी धोक्याची घंटा आहे.

यावर गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देण्यासाठी प्रवेश प्रक्रियेत शाळा आणि महाविद्यालयातील शैक्षणिक गुणवत्ता, सातत्यपूर्ण मूल्यमापन आणि शैक्षणिक कामगिरीला अधिक महत्त्व देणे आवश्यक आहे. प्रवेश परीक्षांवरील अतिनिर्भरता कमी करून गुणवत्तेवर आधारित प्रवेश प्रक्रिया राबविणे हा अधिक न्याय्य आणि सर्वसमावेशक पर्याय ठरू शकतो.

शासन, शिक्षणतज्ज्ञ, पालक आणि समाज यांनी एकत्र येऊन शिक्षणाला स्पर्धेच्या बाजारातून बाहेर काढण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य, शाळा-महाविद्यालयांचे महत्त्व आणि समान शैक्षणिक संधी यांना केंद्रस्थानी ठेवणारी शिक्षण व्यवस्था उभी करणे ही आजची काळाची गरज आहे.

शब्दांकन- महेश मंदा विष्णु पाडेकर (मानसशास्त्र  शिक्षक) अगस्ती महाविद्यालय अकोले जि.अहिल्यानगर

-----------------------------------------


वृत्त प्रसिद्धी सहयोग

समता मीडिया सर्व्हिसेस

श्रीरामपूर - 9561174111

No comments