शेतातील केबल वायर, कट-आऊट व स्टार्टर चोरी करणाऱ्या टोळीचा अडावद पोलिसांकडून पर्दाफाश रविंद्र कोळी अडावद (संपादक -:- हेमकांत गायकवाड) शेत...
शेतातील केबल वायर, कट-आऊट व स्टार्टर चोरी करणाऱ्या टोळीचा अडावद पोलिसांकडून पर्दाफाश
रविंद्र कोळी अडावद
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
शेतकऱ्यांच्या शेतातील कृषी पंपांसाठी वापरण्यात येणाऱ्या केबल वायर, कट-आऊट व स्टार्टरची चोरी करणाऱ्या टोळीचा अडावद पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन संशयित आरोपींना अटक केली असून, त्यांच्या ताब्यातून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
दिनांक १९ ऑगस्ट २०२६ रोजी अडावद शिवारातील शेतकरी श्रीकांत जयनारायण दहाड (रा. राणावत, ता. चोपडा) यांच्या शेतासह लगतच्या परिसरातील इतर शेतकऱ्यांच्या शेतातून केबल वायर, कट-आऊट व स्टार्टर चोरीला गेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी अडावद पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन अडावद पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत कंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल किरण शिरसाट यांच्याकडे तपास सोपविण्यात आला.
गुन्ह्याचा तपास करताना पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र सोनवणे व पोलीस हेडकॉन्स्टेबल भरत नाईक यांनी परिसरातील माहिती संकलित करून संशयितांवर पाळत ठेवली. दरम्यान, पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार के. टी. नगर, अडावद परिसरातील काही इसम शेतातून केबल वायर चोरी करून त्याची विक्री करत असल्याची माहिती मिळाली.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी सुरेश हिरालाल माळी व जगन्नाथ श्रावण महाजन, दोघेही रा. के. टी. नगर, अडावद, ता. चोपडा, यांना ताब्यात घेतले.
पोलिसांनी दोन्ही संशयितांची कसून चौकशी केली असता, त्यांनी दिनांक १९ ऑगस्ट रोजी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास अडावद शिवारातील तक्रारदारासह इतर शेतकऱ्यांच्या शेतातून केबल वायर व कट-आऊट चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
आरोपी सुरेश हिरालाल माळी याने लपवून ठेवलेला चोरीचा संपूर्ण मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात दिला. त्यानंतर पोलिसांनी केबल वायर व इतर कृषी साहित्य असा चोरीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
दोन्ही आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असून, त्यांची रवानगी उपकारागृहात करण्यात आली आहे.
याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत कंडारे यांनी सांगितले की, “शेतकऱ्यांचे साहित्य व कृषी पंपांच्या साहित्याची चोरी करणाऱ्या गुन्हेगारांवर पोलिसांची करडी नजर आहे. अशा प्रकारच्या गुन्हेगारी प्रवृत्तींवर कडक कायदेशीर कारवाई सुरूच राहील.
ही कारवाई पोलीस अधीक्षक, जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत कंडारे, पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र सोनवणे, पोलीस हेडकॉन्स्टेबल किरण शिरसाट, पोलीस हेडकॉन्स्टेबल भरत नाईक तसेच अडावद पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी केली.

No comments