धन कमावण्यापेक्षा मुलांना धम्माचे संस्कार द्या ; सुसंस्कारातूनच कुटुंब आणि समाजाचे खरे वैभव! भिक्खुनी धम्मचारिणी उत्तम माने लातुर जि.प्र...
धन कमावण्यापेक्षा मुलांना धम्माचे संस्कार द्या ;
सुसंस्कारातूनच कुटुंब आणि समाजाचे खरे वैभव! भिक्खुनी धम्मचारिणी
उत्तम माने लातुर जि.प्र.
संपादक हेमकांत गायकवाड
लातूर:- केवळ धन-संपत्ती कमावणे हेच जीवनाचे ध्येय नसून, मिळविलेले धन योग्य मार्गाने टिकविण्यासाठी आणि पुढील पिढीला सदाचाराची वाट दाखविण्यासाठी मुलांना तथागत गौतम बुद्धांच्या धम्माचे सुसंस्कार देणे अत्यंत आवश्यक आहे. धम्माचे संस्कार लाभलेली पिढीच कुटुंब, समाज आणि राष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी सक्षम ठरते,असे प्रतिपादन भिक्खुनी धम्मचारिणी यांनी केले.
लातूर शहरातील बौद्ध नगर येथील वैशाली बुद्ध विहारात बुद्ध धम्म वर्षावासातील ‘पुनीत सुसंस्कार पुनीत पर्वाच्या निमित्ताने आयोजित धम्मपद ग्रंथ वाचन कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
भिक्खुनी धम्मचारिणी पुढे म्हणाल्या की,वर्षावासाचा काळ हा धम्मचिंतन, आत्मपरीक्षण आणि पुण्यप्राप्तीची अनमोल संधी आहे. या काळात बुद्ध विहारात येऊन तथागत बुद्धांच्या विचारांचे श्रवण, मनन आणि आचरण करावे. बुद्धांच्या धम्ममार्गावर चालत आपल्या जीवनाला सदाचार, करुणा, मैत्री, संयम आणि प्रज्ञेची दिशा द्यावी.
आज उपासक-उपासिका श्रद्धेने करीत असलेले दानकर्म ही केवळ धार्मिक परंपरा नसून, अनाथपिंडक, विशाखा आणि सुजाता यांसारख्या महान धम्मउपासकांच्या दानपरंपरेचा अमूल्य वारसा आहे. हा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे ही प्रत्येक धम्मउपासकाची जबाबदारी आहे. मुलांना लहानपणापासूनच धम्माची शिकवण आणि सुसंस्कार दिल्यास त्यांच्यामध्ये सदाचार, माणुसकी आणि सामाजिक बांधिलकीची भावना रुजेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
धम्मपद ग्रंथ वाचन हे सुसंस्कार आणि सदाचारी जीवनासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. धम्मपदातील बुद्धवचने जीवनाला योग्य दिशा देतात. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांसह बुद्ध विहारात येऊन धम्मपदाचे वाचन व श्रवण करावे आणि बुद्धविचार केवळ ऐकण्यापुरते मर्यादित न ठेवता ते प्रत्यक्ष आचरणात आणावेत, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
वैशाली बुद्ध विहारात दररोज सायंकाळी ५ ते ६ या वेळेत धम्मपद ग्रंथ वाचन आयोजित करण्यात आले असून, अधिकाधिक उपासक-उपासिका आणि पालकांनी आपल्या मुलांसह या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.
या कार्यक्रमास दामू कोरडे, गौतम चिकाटे, जगन्नाथ सुरवसे, लता चिकाटे, लता गायकवाड, सविता चिकाटे, आशा बानाटे, नेहा कांबळे, सुमनबाई गायकवाड, कालींदा अंगरखे, गंगुबाई गायकवाड शारदा वाघमारे यांच्यासह मोठ्या संख्येने उपासक-उपासिका उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केशव कांबळे यांनी केले. शेवटी धम्मपालन गाथा आशीर्वाचनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

No comments