शासकीय विश्रामगृहात बायोमेट्रिक हजेरीसह हालचाल रजिस्टरची मागणी नाशिक वि.प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) नाशिक : महाराष्ट्र शासनाच्...
शासकीय विश्रामगृहात बायोमेट्रिक हजेरीसह हालचाल रजिस्टरची मागणी
नाशिक वि.प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
नाशिक : महाराष्ट्र शासनाच्या शासकीय कार्यालयांसह शासकीय विश्रामगृहांमध्ये कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीबाबत पारदर्शकता राहावी, यासाठी बायोमेट्रिक हजेरी प्रणाली लागू करावी तसेच अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या ये-जा नोंदीसाठी हालचाल रजिस्टर ठेवावे, अशी मागणी साप्ताहिक खरे सव्वाशेरचे संपादक व नाशिक विशेष प्रतिनिधी लियाकत खान पठाण यांनी केली आहे.
शासकीय विश्रामगृह हे शासनाच्या मालकीची सार्वजनिक मालमत्ता असून, त्याचा वापर शासनाच्या नियमानुसारच होणे अपेक्षित आहे. मात्र काही ठिकाणी अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीबाबत तसेच विश्रामगृहातील कक्षांच्या वापराबाबत पुरेशी पारदर्शकता नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
शासकीय विश्रामगृह, नाशिक येथे अधिकारी व कर्मचारी कोणत्या वेळेला उपस्थित राहतात आणि कोणत्या वेळेला कार्यालयातून बाहेर पडतात, याची स्पष्ट नोंद राहण्यासाठी बायोमेट्रिक हजेरी अनिवार्य करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच कक्ष वापर, आरक्षण, शुल्क भरणा आणि कक्ष सोडण्याची वेळ याची नोंद ठेवण्यासाठी स्वतंत्र पक्के रजिस्टर ठेवण्यात यावे, अशीही मागणी आहे.
विश्रामगृहातील कक्ष काही तासांसाठी वापरण्यात येत असल्यास त्याचीही नियमानुसार नोंद करून संबंधित शुल्काचा भरणा करण्यात यावा. शासकीय कक्षांचा वापर हा नियमबाह्य पद्धतीने किंवा कोणत्याही प्रकारच्या सवलतीतून होऊ नये, यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नियमित तपासणी करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
लियाकत खान पठाण यांनी आपण शासकीय विश्रामगृहातील कक्षाचा नियमानुसार भरणा करत असून, त्याच्या पावत्या व नोंदी उपलब्ध असल्याचे सांगितले आहे. मात्र विश्रामगृहातील व्यवस्थापन आणि कक्षांच्या वापराबाबत अधिक पारदर्शकता आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची वेळेवर उपस्थिती, कक्षांचे आरक्षण, शुल्क भरणा आणि नोंदवही यांची तपासणी करण्यात यावी. तसेच नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
याबाबत लियाकत खान पठाण हे महाराष्ट्र शासन तसेच संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लेखी निवेदन सादर करणार असून, ‘आपले सरकार’ पोर्टलवरही तक्रार दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले. मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास आमरण उपोषण करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
शासकीय विश्रामगृहातील व्यवस्थापन अधिक पारदर्शक होऊन शासनाचा महसूल वाढतो का आणि संबंधित विभागाकडून या तक्रारीची दखल घेतली जाते का, याकडे आता लक्ष लागले आहे. या प्रकरणाचा साप्ताहिक खरे सव्वाशेरच्या माध्यमातून पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे संपादक लियाकत खान पठाण यांनी स्पष्ट केले.

No comments