स्वातंत्र्यसंग्राम सैनिक स्व. गणपतराव वाघमारे यांच्या ९२ व्या जयंतीनिमित्त अभिवादन व कवी संमेलन उत्साहात मानव सुरक्षा सेवा ट्रस्टतर्फे नित्य...
स्वातंत्र्यसंग्राम सैनिक स्व. गणपतराव वाघमारे यांच्या ९२ व्या जयंतीनिमित्त अभिवादन व कवी संमेलन उत्साहात
मानव सुरक्षा सेवा ट्रस्टतर्फे नित्यानंद सेवा प्रकल्प अनाथ आश्रम येथे विविध उपक्रमांचे आयोजन
विकास पाटील
(संपादक : हेमकांत गायकवाड)
जळगांव : दि. ७ सप्टेंबर २०२६ : स्वातंत्र्यसंग्राम सैनिक तथा समाजासाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व असलेले स्वर्गीय गणपतराव विठोबा वाघमारे यांच्या ९२ व्या जयंतीनिमित्त मानव सुरक्षा सेवा ट्रस्ट, मेहकर जिल्हा बुलढाणा यांच्या अंतर्गत नित्यानंद सेवा प्रकल्प अनाथ आश्रम, विवेकानंद नगर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी स्वातंत्र्यसैनिकांच्या त्याग व देशसेवेचे स्मरण करत त्यांना भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी मानव सुरक्षा सेवा ट्रस्ट शाखा मेहकरचे संस्थापक अध्यक्ष मा. गजाननजी इंगळे साहेब, महाराष्ट्र मीडिया प्रमुख समाधान पदमणे, महाराष्ट्र कोषाध्यक्ष राजेंद्र अवचार तसेच ट्रस्टचे नवनियुक्त पदाधिकारी आणि मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करून सरस्वती मातेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर स्वर्गीय गणपतराव विठोबा वाघमारे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी दत्तात्रय वाघमारे गुरव यांच्यासह वाघमारे परिवाराच्या वतीने स्व. गणपतराव वाघमारे यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.
कार्यक्रमाच्या निमित्ताने नित्यानंद सेवा प्रकल्प अनाथ आश्रम, विवेकानंद नगरचे संचालक अनंत शेळके सर यांचे शारंगधर बालाजीची प्रतिमा व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तसेच मानव सुरक्षा सेवा ट्रस्टचे पदाधिकारी, कवी संमेलनाचे अध्यक्ष कवी, साहित्यिक व चित्रपट अभिनेते डी. आर. बांगर साहेब आणि विशेष निमंत्रित कवी यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यानंतर मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना स्वातंत्र्यसैनिकांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी केलेला त्याग, सामाजिक बांधिलकी आणि देशप्रेमाची भावना पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन केले. कवी संमेलनातून देशभक्तीचा जागर
कार्यक्रमातील विशेष आकर्षण ठरलेल्या कवी संमेलनात सामाजिक, सांस्कृतिक तसेच देशासाठी बलिदान देणाऱ्या वीर जवान व सैनिकांच्या कार्यावर आधारित प्रभावी काव्यरचना सादर करण्यात आल्या. कवींच्या देशभक्तीपर आणि सामाजिक संदेश देणाऱ्या कवितांनी उपस्थितांची मने जिंकली. यावेळी सहभागी व विशेष सन्मानित कवींचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. तसेच नित्यानंद आश्रम येथे एक दिवसीय अन्नदान करण्यात आले.
स्वातंत्र्यसैनिक स्व. गणपतराव वाघमारे यांच्या स्मृतींना उजाळा देत आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम केवळ जयंती सोहळा न राहता देशप्रेम, सामाजिक बांधिलकी, साहित्य आणि सेवाभाव यांचा सुंदर संगम ठरला. कार्यक्रमाच्या शेवटी आयोजक दत्तात्रय वाघमारे यांनी उपस्थित सर्व मान्यवर, पदाधिकारी, साहित्यिक, कवी, आश्रमाचे संचालक, वाघमारे परिवार आणि उपस्थितांचे आभार मानले. उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

No comments