शिरसोडीत पुलाच्या प्रश्नावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा एल्गार; ग्रामस्थांचे बेमुदत उपोषण सुरू अमोल बावस्कार बुलढाणा (संपादक -:- हेमकांत गा...
शिरसोडीत पुलाच्या प्रश्नावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा एल्गार; ग्रामस्थांचे बेमुदत उपोषण सुरू
अमोल बावस्कार बुलढाणा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मलकापूर: शिरसोडी येथील भवानी माता मंदिराजवळील पुलाचा प्रश्न अनेक दशकांपासून प्रलंबित राहिल्याने, अखेर संतप्त ग्रामस्थांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात आजपासून बेमुदत अन्नत्याग उपोषणाचे हत्यार उपसले आहे. गावातील ग्रामदैवत व महापुरुषांना वंदन करून या ऐतिहासिक उपोषणाची सुरुवात मोठ्या संख्येने उपस्थित ग्रामस्थांच्या साक्षीने करण्यात आली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की शिरसोडी येथील भवानी माता परिसरातील पुलाअभावी पावसाळ्यात गाव, शेतकरी, शाळकरी मुले आणि ज्येष्ठ नागरिकांचा संपर्क तुटतो. अनेक दशकांपासून या मार्गावर पुलाचे बांधकाम व्हावे, यासाठी लोकप्रतिनिधींपासून ते प्रशासकीय अधिकाऱ्यांपर्यंत वारंवार निवेदने देऊन पाठपुरावा करण्यात आला. मात्र,आमदार-खासदारांच्या केवळ पोकळ आश्वासनांमुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप उसळला होता. अखेर या संतापाचा उद्रेक होऊन ६ सप्टेंबर रोजी उपोषणाचा इशारा देत उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले होते.
मात्र प्रशासनाने दिलेल्या निवेदनाकडे गांभीर्याने न पाहिल्याने, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने या लढ्याचे थेट नेतृत्व हाती घेतले. आज सकाळी गावातील आराध्य दैवत आणि महापुरुषांना सामूहिक वंदन करून ग्रामस्थांनी मंडपात ठिय्या मांडला. घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला असून, "जोपर्यंत पुलाचे प्रत्यक्ष बांधकाम सुरू होत नाही, तोपर्यंत मागे हटणार नाही," असा आक्रमक पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे.
या उपोषणात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष निलेश नारखेडे, माजी सरपंच ज्ञानदेव भोलवणकर, सुरेश फरपट, अरविंद भोलवणकर, भानुदास भोलवणकर, मलकापूर तालुकाध्यक्ष गोपाल सातव, गणेश खापरे, सुरेश जाधव, नंदू फरपट, पंकज खापरे, चेतन गटमने, अमित नारखेडे, देविदास भोंडेकर यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व शेकडो ग्रामस्थ सहभागी झाले आहेत. पुलाचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघेपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

No comments