शिरपुरात प्रथमच संत सेना महाराज पुण्यतिथीचा भव्य-दिव्य सोहळा शहरातील चौकाचौकात संत सेना महाराजांचे फलक; सकल नाभिक समाज बांधवांचा उत्स्फूर्...
शिरपुरात प्रथमच संत सेना महाराज पुण्यतिथीचा भव्य-दिव्य सोहळा
शहरातील चौकाचौकात संत सेना महाराजांचे फलक; सकल नाभिक समाज बांधवांचा उत्स्फूर्त सहभाग
शिरपूर प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
शिरपूर : नाभिक समाजाचे आराध्य दैवत संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त शिरपूर शहरात यंदा प्रथमच अत्यंत भव्य व नियोजनबद्ध स्वरूपात विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने शहरातील प्रमुख चौकांमध्ये संत सेना महाराजांचे आकर्षक फलक लावण्यात आले असून, संपूर्ण शिरपूर शहरात संत सेना महाराजांच्या पुण्यतिथीचा उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला यंदा नाभिक समाज बांधवांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. विशेष म्हणजे, समाजातील अनेक मान्यवरांनी पुढाकार घेत भंडारा व अन्नदानासाठी स्वेच्छेने आर्थिक मदत केली आहे. तसेच शिरपूर शहरातील सकल नाभिक समाज बांधवांनी एकजुटीने जाहीर वर्गणी देत या उपक्रमाला भक्कम पाठबळ दिले आहे.
यंदाच्या कार्यक्रमाचे नियोजन अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आले असून, संत सेना महाराज उत्सव समितीचे सर्व कार्यकर्ते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत. गेल्या अनेक वर्षांच्या तुलनेत यंदाचा उत्सव अधिक व्यापक स्वरूपात साजरा करण्याचा निर्धार समितीने केला आहे.
गेल्या ४० ते ५० वर्षांच्या कालावधीत प्रथमच शिरपूर शहरात संत सेना महाराज यांची पुण्यतिथी एवढ्या मोठ्या व भव्य स्वरूपात नामांकित शंकर नाना लॉन्स येथे आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
या भव्य सोहळ्यामध्ये नाभिक समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, तसेच ज्येष्ठ नागरिक, सेवानिवृत्त बांधव आणि समाजासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात येणार आहे. समाजातील नव्या पिढीला प्रोत्साहन मिळावे, ज्येष्ठांचा सन्मान व्हावा आणि समाजामध्ये एकोपा व सामाजिक बांधिलकीची भावना अधिक दृढ व्हावी, हा या कार्यक्रमामागील प्रमुख उद्देश आहे.
या सोहळ्याला शिरपूर शहरातील आमदार, नगरसेवक, विविध सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर तसेच नाभिक समाजातील विविध पदाधिकारी उपस्थित राहणार असून, त्यांच्या उपस्थितीत हा ऐतिहासिक सोहळा पार पडणार आहे.
संत सेना महाराज हे केवळ नाभिक समाजाचे आराध्य दैवत नसून त्यांनी आपल्या विचारातून समाजाला सेवा, समता, प्रामाणिकपणा आणि मानवतेचा संदेश दिला. त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा जागर व्हावा, तसेच पुढील पिढीपर्यंत संत सेना महाराजांचे विचार पोहोचावेत, यासाठी अशा प्रकारचे कार्यक्रम सातत्याने आयोजित होणे गरजेचे आहे.
शिरपूर शहरातील सकल नाभिक समाज बांधवांनी एकत्र येत घेतलेला हा पुढाकार निश्चितच कौतुकास्पद असून, यंदाच्या कार्यक्रमाला मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता भविष्यातही संत सेना महाराज पुण्यतिथीचा हा सोहळा दरवर्षी अधिक मोठ्या स्वरूपात साजरा व्हावा, अशी अपेक्षा समाज बांधवांकडून व्यक्त होत आहे.
— रामचंद्र भाऊ येशी
उत्तर महाराष्ट्र विभागीय कार्याध्यक्ष, महाराष्ट्र नाभिक महामंडळ
सकल नाभिक समाज बांधवांना संत सेना महाराज पुण्यतिथीनिमित्त मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!

No comments