अभिजात मराठी भाषेची कलश घटस्थापना (निवडक मराठी भाषिकांनी नोंदवलेल्या बोलक्या प्रतिक्रिया) केंद्रसरकारने मराठीचा हा ऐतिहासिक, सांस्कृतिक आ...
अभिजात मराठी भाषेची
कलश घटस्थापना
(निवडक मराठी भाषिकांनी नोंदवलेल्या बोलक्या प्रतिक्रिया)
केंद्रसरकारने मराठीचा हा ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि साहित्य ठेवा मान्य करूनच ३ ऑक्टोबर २०२४ ला अभिजात मराठी भाषेचा दर्जा देऊन सर्वच मराठी भाषिकांना उपकृत केले आहे. महाराष्ट्र सरकार, साहित्यिक आणि मराठी भाषिकांनी केलेल्या प्रयत्नांना हे गोड यश आले आहे. महाराष्ट्र सरकारने ३ ऑक्टोबर हा दिवस प्रतिवर्ष 'अभिजात मराठी भाषा दिन' म्हणून साजरा करण्याचे निश्चित केले आहे, ही खूपच अभिमानाची गोष्ट आहे.
अभिजात मराठीला मिळालेल्या या सन्मानामुळे सर्वच मराठी भाषकांचा आनंद द्विगुणीत झाला आहे. यावर काही निवडक प्रतिक्रिया खूपच बोलक्या आणि मराठीविषयी अस्मिता जागवणाऱ्या आहेत.
मराठी भाषेला केंद्र सरकारने अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल केंद्र सरकार आणि सर्व मराठी भाषिकांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन! साहित्यिक, आ. लहू कानडे, श्रीरामपूर विधानसभा
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल सर्व मराठी भाषकांचे हार्दिक अभिनंदन!
प्राचार्य, डॉ. शिरीष लांडगे (अहिल्यानगर)
केंद्रिय मंत्रिमंडळाने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला, मराठी भाषेचा गौरव केला, त्याबद्दल केंद्र सरकारचे मनःपूर्वक अभिनंदन! परंतु केवळ अभिजात भाषेचा दर्जा देऊन थांबता कामा नये. मराठी भाषेचा प्रचार, प्रसार व संवर्धन होण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यासाठी राज्यशासनाने काही कठोर शासननिर्णय पारित करणे अपेक्षित आहेत. १३ सप्टेंबर २०२४ च्या शासनादेशानुसार राज्यसरकारने इयत्ता १२ वी पर्यंत सर्व शाखांसाठी मराठी विषय अनिवार्य केला आहेच. पुढील वर्षापासूनच त्यांची तंतोतंत अंमलबजावणी होणे अपेक्षित आहे. घेतलेले निर्णय केवळ कागदावरच राहणार नाहीत एवढीच माफक अपेक्षा.
प्रा. सुनील डिसले (पुणे)
अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघ
माय मराठीचा उचित गौरव-
०३ ऑक्टोबर २०२४ रोजी केंद्रिय मंत्रिमंडळ समितीने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा बहाल केला, हे युगाच्या भाषा चळवळीचे अमृतफळ आहे. श्रीचक्रधर स्वामी, संत ज्ञानेश्वर आदी माहात्म्यांनी आणि अर्वाचीन साहित्यिक, भाषाप्रेमींनी केलेल्या योगदानाला मिळालेली प्रतिष्ठा आहे. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, दीपक केसरकर आदी सर्वांचेच याबद्दल धन्यवाद व्यक्त केले पाहिजे. आता माय मराठी प्रतिष्ठित झाली आहे, माय मराठीच्या लोकप्रियतेला राजकीय सन्मान मोहोर लाभली, याबद्दल अतिशय आनंद आहे. तिचा हा दर्जा अधिक गुणवत्तापूर्ण बनवू या ! धन्यवाद
साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये, (अहिल्यानगर)
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला ही अतिशय आनंदाची बाब आहे. प्राचीन मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे बोली भाषेच्या संशोधनाला गती मिळेल. मराठी भाषा ही स्वतंत्र व स्वंयभू भाषा आहे. अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे मराठी भाषेच्या विकासाला गती मिळणार आहे.
डॉ. नानासाहेब सूर्यवंशी, (लातूर) संपादक, अक्षर वाङ्मय मासिक.
संस्कारक्षम अभिजात मराठीला शासनाची सुवर्ण मोहर लागली. सुवर्णदिनी, सुवर्णक्षणी मराठीच्या इतिहासात सुवर्ण पान लिहिलं गेलं. मराठीला मिळालेले हे अभिजात भाषेचे वैभव हीच मराठी भाषेच्या अस्मितेची खरी ओळख आहे. मराठी भाषा हीच संस्कृतीची प्रमुख वाहक आहे. तिच्या जाज्वल इतिहासाचे आपण सर्वजण पाईक आहोत, याचा सार्थ अभिमान वाटतो. मराठी भाषेच्या प्रसार व प्रचाराचे कार्य करताना, दुसरीकडे मराठी शाळांची स्थिती अत्यंत हलाखीची आहे. ही गंभीर बाब विसरता कामा नये. मराठी शाळा वाचवणे व इयत्ता १२ वी पर्यंत सर्व विद्याशाखेत मराठी विषय अनिवार्य करून प्रत्यक्षात अंमलबजावणी करणे हे शासनापुढे आव्हान आहे. असं झाल्यास खऱ्याअर्थाने मराठी भाषेला सोनियाचे दिवस येतील व तिच्या देखण्या रूपड्याला सौंदर्याची झालर येईल एवढे मात्र निश्चित!
डॉ. मनीषा रिठे, (वर्धा)
कार्याध्यक्ष,
महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषयावर शिक्षक महासंघ
अमृताहूनही रसाळ असणारी मराठी भाषा, ही मूळातच अभिजात भाषा आहे. आता केवळ शासकीय दृष्ट्या तिच्यावर शिक्कामोर्तब झाला आहे. संस्कृती, साहित्य, इतिहासात भाषेचे अभिजातत्त्व असतेच. या अभिजात दर्जामुळे फक्त भाषिक विकासाला आर्थिक पाठबळ मिळेल. मराठी भाषेचे अभिजातत्व, जर खरच टिकून ठेवायचे असेल तर, भाषा संस्कृतीवर जे पाश्चात्य संक्रमन झाले आहे, ते पुसून काढावे लागेल आणि असे झाले तर भाषेचे अभिजात होणे हे प्रत्येक मराठी माणसासाठी लाभकारी असेल.
डाॅ. रमेश पांडुरंग पोळ
प्रमुख, मराठी विभाग,
प्रमुख सद्गुरु गाडगे महाराज कॉलेज, कराड (सातारा)
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला हा सुवर्णक्षण आहे.
सौंदर्याने परिपूर्ण असलेल्या भाषेला तिच्या समृद्धीसाठी खऱ्या अर्थाने राजमार्ग प्राप्त झाला. मराठी विषय शिक्षक महासंघाने प्रामुख्याने इयत्ता बारावी पर्यंत मराठी भाषा सर्व विद्याशाखा अनिवार्य व्हावी तसेच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी प्रामुख्याने लढा दिला. स्वयंभू असलेल्या मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाल्याने ती जगमय होईल यात शंका नाही..
प्रा. बाळासाहेब माने, (मुंबई)
सचिव, मराठी विषय शिक्षक महासंघ, महाराष्ट्र राज्य
संपूर्ण महाराष्ट्राला व जगभरात पसरलेल्या मराठी जणांना अभिमान वाटावा अशी बातमी घटस्थापनेच्या दिवशी आली आणि महाराष्ट्रातीलच नव्हे तर जगभरातील मराठी जणांचा ऊर अभिमानाने भरून आला. ही बातमी होती मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याची. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा हे महाराष्ट्रातील तेरा कोटी जनतेचे स्वप्न होते. हे स्वप्न साकार होण्यासाठी काही दशकांची वाट पहावी लागली मात्र उशिरा का होईना हे स्वप्न साकार झाले. यासाठी केंद्र सरकारचे मनापासून आभार मानावे लागेल. त्यासोबतच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे यासाठी संघर्ष करणाऱ्या हजारो ज्ञात अज्ञात व्यक्तींनाही सलाम करावा लागेल.
पत्रकार गोरे साहेब,
दैनिक केसरी, (संभाजीनगर)
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा ही खूपच अभिमानास्पद बाब.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने मराठी भाषेला अधिक प्रोत्साहन मिळेल. मराठी साहित्याचं शास्त्रशुद्ध संशोधन होईल, त्यावर आधारित नवी पुस्तके, लेख, आणि तांत्रिक साधनं निर्माण केली जातील. मराठी भाषेच्या अभ्यासकांना नव्या शक्यता आणि संशोधनाच्या संधी मिळतील.
अशा प्रकारे, अभिजात दर्जा केवळ एका भाषेचं महत्त्व अधोरेखित करत नाही, तर तिच्या संवर्धनासाठीही अनेक दारं उघडतो. मराठी भाषा जरी या निर्णयामुळे जागतिक पटलावर आली असली, तरी तिचं स्थान अधिक बळकट करण्यासाठी आपल्याला सामूहिक प्रयत्न करावे लागतील. विशेषतः नव्या पिढीमध्ये या भाषेचं महत्त्व वाढवणं, तिचा अभ्यास करायला प्रोत्साहित करणं, आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मराठी भाषेला नवीन पिढीत रुजवणं हे आपलं कर्तव्य आहे.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणं ही सर्व मराठी भाषिकांसाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. यामुळे मराठी भाषेचं सांस्कृतिक, सामाजिक आणि साहित्यिक महत्त्व अधिक ठळक होईल. अभिजात भाषेचा दर्जा ही एका प्रकारची मान्यता आहे की, मराठी भाषा फक्त संवादाचं साधन नाही, तर ती आपल्या संस्कृतीचं मूळ आहे. मराठी भाषेचा हा गौरव तिच्या जतनासाठी, संवर्धनासाठी, आणि प्रसारासाठी नक्कीच एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरेल. -
पत्रकार शौकतभाई शेख
संस्थापक: समता फाऊंडेशन,श्रीरामपूर (अहिल्यानगर)
मराठी अभिजात भाषा
अभिजात मराठी निश्चितच
उच्च दर्जाची, कुलीन, खानदानी, घरंदाज भाषा आहे. स्पष्ट रोखडी, व्याकरण शुद्ध व विविध बोलीभाषांनी नटलेली अशी भाषा आहे.
केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे.
खरे तर संस्कृत कुलोत्पन्न व प्राकृत भाषा प्रणालीतील मराठी भाषेचा इतिहास फार जुना आहे. सर्व भाषांची जननी म्हणून देवभाषा किंवा गिर्वाणवाणी म्हणून संस्कृतकडे बघितलं जाते त्याच भाषापरिवारातून मराठी निर्माण झाली आहे. असे असताना मराठी भाषा केवळ किचकट निकषात अडकवून ठेवण्याचा प्रकार झाल्याने तिला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी विलंब झाला. मराठी भाषेचा इतिहास हा दोन हजार वर्षे प्राचीन आहे . प्राचीन साहित्याचा समृद्ध व मौल्यवान वारसा लाभलेला आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे भाषासंवर्धन होण्यास मदत होईल.
मराठीच्या भाषेतील अनेक बोलींचा भाषांचा अभ्यास, संशोधन, साहित्य व लोकसाहित्य संग्रहित करण्यासाठी मदत होईल.
मराठी भारतीय विद्यापीठीय भाषा म्हणून शिकता येईल. संशोधन वाढेल. मराठी भाषेतील प्राचीन ग्रंथ अन्य भाषेत अनुवादित करणे शक्य होईल. मराठी ग्रंथालये साहित्य संपन्न होतील. मराठी भाषेसाठी संशोधन अनुवाद व अन्य काम करणाऱ्या संस्था, व्यक्ती, विद्यार्थी अशा साऱ्यांना भरीव शासकीय मदत मिळेल. नोकरी व्यवसायाच्या संधीत वाढ होईल. सांस्कृतिक आणि संशोधन क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध होतील. त्याचबरोबर संवर्धन, माहिती गोळा करणं, या भाषांमधील पुरातन साहित्याचं डिजीटायझेशन यामुळे भाषांतर, नोंद, विविध साहित्याचं प्रकाशन तसंच डिजीटल माध्यमातून रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतील.
प्रा. काकासाहेब वाळुंजकर, माजी सहाय्यक विभागीय अधिकारी, (अहिल्यानगर)
दोन हजार वर्षांपूर्वीपासून भारतातील एका मोठ्या भूभागावरील माणसांमध्ये मराठी भाषेतून भावभावनांचे आदानप्रदान होत आलेले आहे. शिवाय ही केवळ लोकभाषा नसून ज्ञानभाषाही होती हे तत्कालिन 'बृहत्कथा', 'दीपवंश', 'महावंश', 'गाथा सप्तशती', 'विनयपिटक' अशा अनेक उपलब्ध ग्रंथावरून सिद्ध झालेले आहे. अशा प्राचीन मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणजे तिला राजमान्यता मिळाली असे म्हणता येईल. यामुळे मराठी भाषिकांचा ऊर भरून येणे आणि हा आपल्या मातेचा सन्मान वाटणे साहजिक असले तरी आता तिचे जतन, संवर्धन आणि तिचा विकास करण्याची जबाबदारीही मराठी भाषिकांचीच आहे. अन्यथा मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणून आनंदोत्सव साजरा करायला आणि त्या भाषेचा वारसा चालवणाऱ्या आपल्या मुलांना इंग्रजी शाळांतून शिकवायचे, ही भूमिका दुटप्पीपणाची ठरू शकते .
डॉ. शिवाजी काळे, श्रीरामपूर, (अहिल्यानगर)
अभिजात मराठी आमुची-
भाषा कोणतीही असो, प्रत्येक भाषिकांसाठी आपली मातृभाषा आणि संस्कृती टिकवण्याची मौलिक जबाबदारी असते. तरीही, शासनाकडून मान्यता प्राप्त भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे हे आजच्या युगातील उन्नतीकडे उचललेले महत्त्वाचे पाऊल आहे.
आज ३ ऑक्टोबर रोजी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याची बातमी समस्त मराठी भाषिकांसाठी अतिशय आनंदाची आहे. परंतु, आपली मराठी भाषा इतकी प्राचीन असूनही, संतांची वाणी, क्रांतीवीरांची भूमी आणि साहित्यिकांचा वारसा असतानाही तिला अभिजात भाषेचा दर्जा नव्हता, ही खरोखरच आश्चर्याची बाब होती.
"माझ्या मराठीची बोलू कौतुके, परी अमृतातेहि पैजासी जिंके," संत ज्ञानेश्वरांच्या या सुंदर ओळी आठवतात.
मराठी बांधवांनी आपापल्या परीने मातृभाषा आणि मराठी संस्कृती जपली, आणि पुढील पिढ्यांना घडवले. तसेच, अनेक मराठी बांधवांनी मराठी सेवेसाठी आपले तन, मन, धन अर्पण केले. अग्रेसर कार्यकर्ते, मराठी शिक्षक, साहित्यिक आणि रसिक यांनी मराठी सेवेसाठी केलेले परिश्रम आज खऱ्या अर्थाने फळास आले आहेत, असे अंतःकरणातून वाटते. बाहेरच्या जगात इंग्रजीचा प्रभाव वाढत असताना, महाराष्ट्रात काही मराठी शाळा बंद होऊ लागल्या. अलीकडे सरकारकडून अनुदान न मिळाल्याने बृहन्महाराष्ट्रातल्या ज्या एखाद दुसऱ्या मराठी शाळा होत्या त्या शाळांना सुद्धा कुलूप लागले. अशा बातम्या वाचून प्रत्येकालाच वाटले की, मराठी भाषेबरोबर मराठी संस्कृतीवर याचे विपरीत परिणाम होतील. मराठी बांधवांना कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागेल. आज मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे जितके अभिमानाचे आहे, तितकेच मराठीला अधिक प्रगतीपथावर नेण्याची जबाबदारीही महत्त्वाची आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुस्तकालयांमध्ये मराठी पुस्तके आणि वृत्तपत्रांचा समावेश होईल. तेव्हा आपल्याकडून दर्जेदार लेखन व्हायला पाहिजे. मराठी शुद्धलेखन कार्यशाळा लवकरात लवकर सुरू झाल्या पाहिजेत. इंग्रजी शब्द न वापरता प्राचीन मराठी शब्दांचा अभ्यास ताकदीने झाला पाहिजे. मराठी पुस्तके इतर भाषांमध्ये अनुवादित झाली पाहिजेत. मराठीचे भविष्य निश्चितच उज्ज्वल आहे, याबद्दल आता कोणतीही शंका नाही.
सदैव अजरामर आपल्या मराठीसाठी मी लिहिलेल्या काही ओळी..
वृत्त : देवप्रिया
तीच माझ्या लेखणीची धार असली पाहिजे
याच गर्वाने मराठी आज शिकली पाहिजे..
संस्कृतीचे बोट धरुनी लागले चालायला
संगतीला जोडणारी माळ जपली पाहिजे..
वीर गेले धीर गेले राहिले नेते इथे
राष्ट्र उद्धारक म्हणूनी वाट धरली पाहिजे..
फ्रेंच, जर्मन शिकत जाता अन् मराठी विसरता
माय बापांच्या उराची जाण असली पाहिजे..
लांब परदेशात रमती हीच लोक आपली
मातृभाषा संस्कृतीशी गाठ जुळली पाहिजे..
सौ. दिपाली महेश वझे, (बेंगळूरू)
'माझी मराठी' मासिक- कर्नाटक
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन!
संतोष मते, निवेदक, अहमदनगर आकाशवाणी केंद्र
मराठी भाषेचा परीघ खूप मोठा आहे.मराठ्यांच्या काळात तर या भाषेने जवळपास संपूर्ण भारताला व्यापून टाकले होते. आजही दिल्लीपासून तंजावूर पर्यंत मराठी बोलणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. या सर्वांना कवेत घेऊन मराठी भाषा व संस्कृतीचा विस्तार करणे आवश्यक आहे. प्रत्येकालाच आपली मातृभाषा आईप्रमाणे प्रिय असते, त्यामुळे मराठीवर प्रेम करून ती कुटुंबात क्षणोक्षणी वापरायला हवी. त्यातून भाषिक प्रतिष्ठा आपोआपच वाढीस लागेल. मराठीला अभिजात भाषेचा जो दर्जा मिळाला आहे, तो निश्चितच मोलाचा आहे. आता अखिल भारतीय स्तरावर मराठी सन्मानाने उभी राहील आणि केंद्र राज्य सरकारांतर्फे या भाषेच्या विकासासाठी या भाषेच्या संवर्धन व विकासासाठी अनेक प्रयत्न केले जातील, त्यातून मराठी अधिक समृद्धशाली होत जाईल असा विश्वास आहे. खरे म्हणजे मराठी आता ज्ञानभाषा व्हायला हवी. इतर भाषातील सर्वोच्च ज्ञान मराठी जर उपलब्ध झाले तर आपल्याला दुसऱ्या भाषांचा आधार घ्यावा लागणार नाही.
डॉ. श्रीकृष्ण काकडे, (आकोला)
भाषा व लोकसंस्कृती अभ्यासक
केंद्र शासनाकडून मराठीला आज अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. मराठी साहित्यातील ज्ञानेश्वरी नाथ भागवत, दासबोध, श्री जगद्गुरु तुकाराम महाराजांची तुकाराम गाथा हे मराठी ग्रंथ यातून मराठी प्रसवली, यामुळे मराठी भाषा अजरामर ठरली. आद्यकवी मुकुंदराज यांनी लिहिलेला विवेक सिंधू हा ग्रंथ महत्त्वाचा आहे. महाराष्ट्रासाठी आजचा दिवस ऐतिहासिक व दैदीप्यमान आहे. आज सोन्याचा दिनू उजाडला म्हणता येईल.
कारण दुर्गा देवीची घटस्थापना आणि मराठी भाषेला मिळणारा अभिजात दर्जा या दोन्ही गोष्टीचा योगायोग आला आहे. या अगोदर केंद्र सरकारने सर्वप्रथम तमिळ या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला त्यानंतर संस्कृत, तेलगू, कन्नड, मल्याळम, उडिसा या भाषेला देण्यात आला आणि आता आपली मायबोली आपला जीव की प्राण, आपली अस्मिता म्हणजेच मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यात आला.
शेकडो वर्षापासूनची मागणी आज पूर्णत्वाला गेली.
मराठी साहित्य परिषदेने अनेक ठिकाणी केलेले आंदोलनाला यश आले. मराठी भाषेबरोबर बंगाली, पाली, प्राकृत, आसामी या ही भाषांना अभिजात दर्जा केंद्र सरकारने देऊन मराठी भाषेचे वैभव त्यांनी स्वीकारले. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला. ३ आक्टोंबर हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून महाराष्ट्र राज्याचे मा. मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांनी जाहीर केले आहे तसेच आज बरोबर ७५० वर्षापूर्वी संत ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी सांगितली व ती सच्चिदानंदानी लिहून काढली या गोष्टीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. संत ज्ञानेश्वरीच्या माझा मराठीची बोलू कौतुके। या ओळीचा दाखलाही दिला आहे. ज्ञानेश्वरी जयंती दिनी मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला.
साहित्यिक, प्रा. विठ्ठल बरसमवाड, (अहिल्यानगर).
अभिजात दर्जामध्ये श्रीरामपूरचा सहभाग - मराठी भाषा तेराव्या शतकात माहीम भटांनी लिहिलेले 'लीळाचरित्र', मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा बहाल करताना ज्या सप्तशती ग्रंथांचा पुरावा ग्राह्य धरला गेला. त्यात श्रीरामपूर तालुक्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदीचा उल्लेख आढळतो. याच गोदावरीच्या काठावर सराला गाव आहे. येथे तेरावे शतकात माहीम भटांनी प्रथमच प्राकृत भाषेत लिहिलेल्या 'लीळाचरित्र' ग्रंथाचे पुरावे आढळतात. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याआधी श्रीरामपूरसह नगर जिल्ह्यासाठी ही अभिमानाची बाब आहे. पत्रकार रवी भागवत (अहिल्यानगर)
मराठी भाषेला मिळालेला अभिजात मराठी भाषेचा सन्मान ही खूपच अभिमानाची गोष्ट आहे. मराठी भाषा ही मराठी मनाची अस्मिता, संस्कार आणि विचार आहे. 'लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी' खरोखरच मराठी माणसांच्या नसानसातून, श्वासाश्वासातून मराठी आणि मराठीच आहे. या भाषेचा गौरव ही महाराष्ट्राची शान आहे. तिचे जतन, संवर्धन आणि समृद्धी टिकविणे आणि वाढविणे हे मराठी भाषकांचे आद्य कर्तव्य आहे.
संकलन
डॉ. शरद दुधाट
जिल्हाध्यक्ष,
मराठी विषय शिक्षक महासंघ (अहिल्यानगर)
प्रसिद्धी सहयोग
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - ९५६११७४१११
No comments