रासेयो शिबीरात रूजलेल्या मूल्यांच्या मदतीने किर्तीचा कळस उंच जाऊ द्या : रोहन पाटील चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) राष्ट्रीय ...
रासेयो शिबीरात रूजलेल्या मूल्यांच्या मदतीने किर्तीचा कळस उंच जाऊ द्या : रोहन पाटील
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
राष्ट्रीय सेवा योजना ही एक सरकारी योजना असून तिचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी निर्माण करणे, नेतृत्व गुण विकसित करणे आणि सामुदायिक सेवा कार्यक्रमांमध्ये स्वयंसेवकांना सहभागी करून त्याचा व्यक्तिमत्त्व विकास घडवणे हा आहे, त्यात स्वच्छता, प्रौढ शिक्षण, ग्रामीण विकास, मतदान जागृती, लोकसंख्या नियंत्रण आणि आपत्कालीन मदत यांसारख्या कामांचा समावेश असतो. ह्या योजनेच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी, श्रमदान, व्यक्तिमत्त्व विकास, सौजन्यता, आत्मविश्वास, सृजनशीलता या मूल्यांची रूजवण होत असुन रासेयो शिबीरात रूजवण झालेल्या मूल्यांच्या आधारे स्वत:चा आणि सामाजिक किर्तीचा कळस उंच जाऊ दया असे प्रतिपादन माजी जि. प. सदस्य रोहन पाटील यांनी व्यक्त केले. किसान महाविद्यालयातील रासेयो एकक द्वारा मोंढाळे या दत्तक गावात आयोजित ७ दिवसीय श्रमसंस्कार शिबिराच्या समारोप समारंभाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.जी.एच. सोनवणे होते. प्रमुख पाहुणे सरपंच शितल पाटील अभियंता अनिल पाटील, उपसरपंच अशोक पाटील सर्व ग्रा. पं. सदस्य मुख्याध्यापिका वैशाली बोरसे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.के.एस.गायकवाड यांनी मांडलेत. प्रमुख पाहुणे म्हणून मनोगत व्यक्त करतांना अभियंता अनिल पाटील यांनी आजच्या नेतृत्वाने राजकीय क्षेत्राकडे विकासाचे साधन म्हणून पाहिल्यास ग्रामीण भागातील विकास भरून निघण्यास मदत होईल असे सांगितले. सदर शिबीराचे अहवाल वाचन सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ. शशिकांत पाटील यांनी केले. लिना पाटील आणि समाधान पाटील यांना शिबीरातील सर्वोत्कृष्ट स्वयंसेवक म्हणून गौरविण्यात आले. शौर्य गटातील स्वयंसेवकांनी जि. प. प्रा. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना वही-पेन वाटप उपक्रम राबवून इतर स्वयंसेवकांसमोर आदर्श ठेवला. सकाळच्या सत्रात स्वयंसेवकांनी मोंढाळे दत्तक गावात एक मुठ धान्य संकलन उपक्रम राबवून धान्य गोळा केले. सदर गोळा झालेले धान्य गावातील गरीब गरजूंना मदत म्हणून वाटप करण्याची घोषणा सरपंच शितल पाटील यांनी केली. राज पाटील आणि जयश्री चौधरी यांनी शिबीर आढावा सादर केला. अध्यक्षीय मनोगतातून उपप्राचार्य डॉ.जी.एच. सोनवणे यांनी शिबीरातून मिळालेले संस्कार स्वयंसेवकांना भावी जीवनातील करीयर घडविण्यासाठी निश्चितच प्रेरणादायी ठरतील असे सांगितले. सुत्रसंचालन कृत्तिका पाटील तर आभार मयुर पाटील या स्वयंसेवकांनी मांडलेत. महीला कार्यक्रम अधिकारी डॉ. सविता चौधरी, डॉ. अतुल पाटील, प्रविण वाघ आणि राजू केदार यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

No comments