धनाजी नाना महाविद्यालयात 'आत्मनिर्भर युवती अभियानाचा समारोप कायदेशीर दृष्ट्या सक्षम करण्यासाठी विविध तज्ज्ञांनी केलं मार्गदर्शन इदू...
धनाजी नाना महाविद्यालयात 'आत्मनिर्भर युवती अभियानाचा समारोप
कायदेशीर दृष्ट्या सक्षम करण्यासाठी विविध तज्ज्ञांनी केलं मार्गदर्शन
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
फैजपूर येथील तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तरमहाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव आणि महाविद्यालयीन विद्यार्थी विकास विभाग व युवती सभा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पाच दिवसीय 'आत्मनिर्भर युवती' अभियानाचा समारोप संपन्न झाला. आधुनिक काळातील आव्हाने पेलण्यासाठी युवतींना सक्षम करण्याच्या उद्देशाने या विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते, ज्यात महाविद्यालयातील ७५ विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. पहिल्या दिवशी चिनावल प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकारी दीपल पाटील यांनी महिलांच्या आरोग्य समस्या आणि त्यावरील उपचारांबाबत सविस्तर माहिती दिली. दुसऱ्या दिवशी मनीषा सरोदे यांनी ‘स्वयंरोजगार’ या विषयावर मार्गदर्शन करत टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ आणि कलात्मक वस्तू बनवण्याचे प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले, जेणेकरून विद्यार्थिनी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होऊ शकतील. तिसऱ्या दिवशी डॉ. कल्पना पाटील यांनी महिलांच्या सामाजिक जीवनातील स्थान आणि संघर्षावर प्रकाश टाकला.
कार्यक्रमाच्या चौथ्या दिवशी शारीरिक सक्षमतेवर भर देण्यात आला. कराटे प्रशिक्षक. बापू हजबन यांनी विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे तंत्र आणि प्रात्यक्षिके करून दाखवली. पाचव्या दिवशी सावदा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक विशाल पाटील यांनी सायबर क्राईम आणि महिला सुरक्षिततेबाबतच्या कायद्यांची माहिती दिली. सध्याच्या डिजिटल युगात सायबर फसवणुकीपासून कसे सावध राहावे, याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. समारोप प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे अधिसभा सदस्य डॉ. पद्माकर पाटील उपस्थित होते. त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की, आत्मनिर्भर झालेली युवतीच उद्याची आदर्श समाजसेविका, प्राध्यापिका किंवा डॉक्टर म्हणून समाजाला दिशा देऊ शकते. संस्थेचे सदस्य व माजी प्राचार्य डॉ. जी. पी. पाटील यांनी युवतींच्या विविध क्षेत्रांतील भरारीचे कौतुक केले. अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र वाघूळदे यांनी विद्यापीठाचे आभार मानले आणि विद्यार्थिनींना जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर स्वावलंबी होण्याचा संदेश दिला प्रास्तविक डॉ. जयश्री पाटील यांनी केले, तर सूत्रसंचालन . चेतना पाटील हिने केले. शेवटी दुर्गेश्वरी पंडित हिने आभार मानले. या अभियानाच्या यशस्वीतेसाठी विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. विजय सोनजे, उपप्राचार्य डॉ. कल्पना पाटील यांच्यासह डॉ. सविता कलवले, डॉ. सरला तडवी, डॉ. सीमा बारी, डॉ. पल्लवी भंगाळे आणि इतर प्राध्यापक वृंदाने विशेष परिश्रम घेतले.

No comments