स्वप्न साकारण्यासाठी अभ्यासाशिवाय पर्याय नाही; गटशिक्षणाधिकारी विश्वनाथ धनके भरत कोळी यावल (संपादक -:- हेमकांत गायकवाड) ग्रामीण भागातील वि...
भरत कोळी यावल
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी आयुष्यात मोठी स्वप्ने पाहावीत आणि ती साकार करण्यासाठी प्रामाणिक मेहनत व सातत्यपूर्ण अभ्यास केला पाहिजे. ग्रामीण भागात शैक्षणिक सुविधा मिळवताना अनेक अडचणी येतात, मात्र त्या अडचणींवर मात करून योग्य पात्रता मिळवण्यासाठी अभ्यासाशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. प्रामाणिक कष्टाचे फळ नक्कीच मिळते, असे प्रतिपादन यावल तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी विश्वनाथ धनके यांनी केले. ते येथील श्री समर्थ रघुनाथबाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आयोजित विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
या प्रसंगी विद्यालयातील उपक्रमशील शिक्षक प्रशांत सोनवणे यांनी आपल्या मातोश्री स्व. लतिका सुरेश सोनवणे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ एक प्रेरणादायी उपक्रम राबवून इयत्ता पाचवी ते बारावीतील प्रथम क्रमांक मिळवणारे तसेच विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन करणारे एकूण २५ गुणवंत विद्यार्थी बक्षीस देऊन सन्मानित केले. या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे यशस्वी विद्यार्थ्यांसोबतच त्यांच्या आई-वडिलांचाही गौरव करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले.
कार्यक्रमात समाज कल्याण उपायुक्त प्रमोद राणेराजपूत यांनी विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून अभ्यासात सातत्य ठेवावे, मोबाईलवरील रिल्स पाहण्यात वेळ वाया न घालवता त्याचा सकारात्मक वापर करावा, असे मार्गदर्शन केले. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ (अडावद) यांनी विद्यार्थ्यांनी गट करून अभ्यास करण्याचा सल्ला देत पालकांनी मुलांमध्ये जिद्द व आत्मविश्वास निर्माण करण्याची गरज व्यक्त केली तसेच कायद्याविषयी माहिती दिली. सेवानिवृत्त प्राचार्य विनायक तेली यांनी शिस्त ही यशाची गुरुकिल्ली असल्याचे सांगून विद्यार्थ्यांना प्रेरित केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष सुरेश चौधरी होते. व्यासपीठावर सचिव जगन्नाथ कोळी, प्राचार्य देविदास मोरे, सेवानिवृत्त प्राचार्य विनायक तेली, गटशिक्षणाधिकारी विश्वनाथ धनके, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, नवनियुक्त उपायुक्त प्रमोद राणेराजपूत यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक संजय गोसावी यांनी केले, तर आभार सुनील पाटील यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका व कर्मचारीवृंद यांनी परिश्रम घेतले. या सोहळ्यास चुंचाळे परिसरातील पालक, ग्रामस्थ व माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments