१४ एप्रिल—भारतीय इतिहासातील सुवर्णदिन; हातेड बुद्रुक येथे आंबेडकर जयंती उत्साहात साजरी मच्छिंद्र कोळी गलंगी (संपादक :- हेमकांत गायकवाड) आदर...
मच्छिंद्र कोळी गलंगी
(संपादक :- हेमकांत गायकवाड)
आदर्श गाव हातेड बुद्रुक येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, मानवमुक्तीचे महान पुरस्कर्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभूतपूर्व उत्साह, एकात्मता आणि सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडले. सकाळपासूनच गावात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते. गावातील मान्यवर, ज्येष्ठ नागरिक, महिला, तसेच उत्साही तरुण-तरुणी आणि बालमित्र मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सोहळ्याला भव्यता प्राप्त करून दिली. कार्यक्रमात श्री. मनोज अशोक सनेर, डॉ. पाडूरंग वंजी सोनवणे, तसेच श्री. नंदुभाऊ गुलाब बाविस्कर यांच्या प्रभावी भाषणांनी विशेष रंग भरला. आपल्या मनोगतात त्यांनी डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित करत, त्यांच्या तत्त्वज्ञानाची आजच्या समाजासाठी असलेली गरज स्पष्ट केली. “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” हा संदेश उपस्थितांच्या मनात नवचैतन्य निर्माण करणारा ठरला. समानता, बंधुता आणि न्याय या मूल्यांची जपणूक करण्याची प्रेरणा यावेळी सर्वांना मिळाली.
कार्यक्रमादरम्यान सामाजिक ऐक्याची प्रचितीही प्रकर्षाने जाणवली. जल्लोषात पार पडलेल्या या सोहळ्याने गावातील एकजुटीचे सुंदर चित्र उभे केले. यावेळी आयोजित सामूहिक भोजन कार्यक्रमाने उत्सवात अधिक रंग भरला. कडी-खिचडीचा सुग्रास बेत सर्वांसाठी ठेवण्यात आला होता. या उपक्रमामुळे आपुलकी, समानता आणि बंधुभाव अधिक दृढ झाला. एकूणच, हातेड बुद्रुक येथे साजरी झालेली ही जयंती केवळ औपचारिकता न राहता विचारांची क्रांती, सामाजिक जागृती आणि एकात्मतेचा जिवंत उत्सव ठरली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रकाश समाजाला सतत दिशा देत राहो, अशी सामूहिक भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

No comments