आरटीओला दिसत नाहीत का १५० बेकायदा हायवा?” ओव्हरलोड माती वाहतुकीवर प्रशासनाची मूक भूमिका; नागरिकांमध्ये संताप लातूर (प्रतिनिधी) (संपादक -:- ...
आरटीओला दिसत नाहीत का १५० बेकायदा हायवा?”
ओव्हरलोड माती वाहतुकीवर प्रशासनाची मूक भूमिका; नागरिकांमध्ये संताप
लातूर (प्रतिनिधी)
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
लातूर जिल्ह्यातील निलंगा, शिरूर अनंतपाळ व देवणी तालुक्यात तेरणा व मंजरा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर अवैध काळी माती उपसा सुरू असल्याचे गंभीर वास्तव समोर आले आहे. या मातीची वाहतूक सुमारे १५० हायवा वाहनांद्वारे दिवस-रात्र केली जात असून, अनेक वाहने ओव्हरलोड अवस्थेत थेट प्रादेशिक परिवहन कार्यालय, लातूर समोरूनच धावत असल्याने आरटीओच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, निलंगा तालुक्यातील शिरोळ, वांजरवाडा, शेद तसेच शिरूर अनंतपाळ तालुक्यातील हलकी आणि देवणी तालुक्यातील हेळंब परिसरात जेसीबी व पोकलेन मशिनच्या सहाय्याने नदीपात्रातून काळी माती मोठ्या प्रमाणावर उपसली जात आहे. या मातीची वाहतूक करणाऱ्या हायवा वाहनांनी क्षमतेपेक्षा अधिक माल भरून नेण्यासाठी वाहनांची उंची वाढवून नियमांचे उघड उल्लंघन केले आहे.
विशेष म्हणजे, ही ओव्हरलोड वाहतूक भर दिवसा प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोरूनच सुरू असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. त्यामुळे संबंधित विभागाकडून माती माफियांना मूक संमती दिली जात आहे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, प्रशासनाच्या कथित दुर्लक्षामुळे अवैध उत्खनन व ओव्हरलोड वाहतूक सर्रास सुरू असून कोणतीही ठोस कारवाई होताना दिसत नाही. या प्रकारामुळे शासनाचा महसूल मोठ्या प्रमाणात बुडत असून पर्यावरणालाही गंभीर धोका निर्माण झाला आहे.
दरम्यान, ओव्हरलोड हायवा वाहनांच्या बेदरकार वेगामुळे अपघाताचा धोका वाढला असून, जड वाहनांमुळे रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे. अनेक ठिकाणी रस्ते खचल्याने नागरिक, शेतकरी व प्रवासी त्रस्त झाले आहेत.
या सर्व प्रकाराची दखल घेत प्रशासनाने तातडीने संयुक्त मोहीम राबवून अवैध उत्खनन आणि ओव्हरलोड वाहतूक बंद करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.
No comments