महावितरण कार्यालयात स्वाभिमानीचा दोन तास ठिय्या आंदोलन अमोल बावस्कार बुलढाणा (संपादक -:- हेमकांत गायकवाड) मलकापूर:- चोरीला गेलेल्या विद्यु...
महावितरण कार्यालयात स्वाभिमानीचा दोन तास ठिय्या आंदोलन
अमोल बावस्कार बुलढाणा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मलकापूर:- चोरीला गेलेल्या विद्युत तारा तात्काळ लावाव्यात व तारचोरी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, या प्रमुख मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मलकापूर येथील महावितरण कार्यालयात तीव्र ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी शेतकरी मोठ्या संख्येने आक्रमक झाल्याने संपूर्ण कार्यालय परिसर दोन तास दणाणून गेला. महावितरणचे अभियंता तायडे साहेब यांना संघटनेच्या वतीने घेराव घालत १५ दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला.
गेल्या एक वर्षांपासून मलकापूर तालुक्यातील शेती शिवारातील विद्युत तारा मोठ्या प्रमाणात चोरीला जात आहेत. मात्र अद्यापही चोरट्यांचा शोध लागत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या प्रकारामुळे अनेक शेतकरी सिंचनापासून वंचित राहत असून आर्थिक संकटात सापडले आहेत. आगामी २० दिवसांवर पेरणी हंगाम येऊन ठेपला असताना शेतकऱ्यांना शेतीसाठी विजेची अत्यंत आवश्यकता आहे. जर तारा वेळेत बसवण्यात आल्या नाहीत तर त्याचे गंभीर आर्थिक परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागतील, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला.
यावेळी प्रशासनाच्या भूमिकेवरही तीव्र प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. “सामान्य गुन्ह्यांमध्ये पोलिस तत्काळ कारवाई करतात, मग वारंवार होणाऱ्या तारचोरीच्या घटना अजूनही उघडकीस का येत नाहीत?” असा सवाल आंदोलकांनी उपस्थित केला.
महावितरण कार्यालयातील आंदोलनानंतर सर्व शेतकऱ्यांनी शहर पोलिस स्टेशनकडे मोर्चा वळवत ठाणेदार गिरी साहेब यांना घेराव घालत तारचोरी प्रकरणी कठोर कारवाईची मागणी केली.
या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष निलेश नारखेडे, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) जिल्हा कार्याध्यक्ष प्रसाद दादा जाधव, जिल्हा उपाध्यक्ष बाळू ठाकरे, राष्ट्रवादी चे बाळू पाटील, तालुकाध्यक्ष गोपाल सातव, सुनील वानखेडे, कैलास मोरे, धनराज सपकाळ, सय्यद इरफान सय्यद हारून, श्रीकृष्ण बोदळे, सुधीर पाटील, सुरेश भोपळे, विनोद हांडगे, भगवान खूपसे, प्रशांत दांडगे, पंढरी आमले, रामदास काटोने यांच्यासह हजारो शेतकरी उपस्थित होते.


No comments