वितरण कंपनीकडून शेतकऱ्यांना ८ ऐवजी ६ तास वीज; पूर्ववत पुरवठ्याची काँग्रेसची मागणी किरण धायले | मुक्ताईनगर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) महार...
किरण धायले | मुक्ताईनगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने शेतकऱ्यांना देण्यात येणारा आठ तासांचा वीज पुरवठा कमी करून सहा तास करण्याचा निर्णय घेतल्याने शेतकरी वर्गात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. दि. २५ मे २०२६ ते १५ जून २०२६ या कालावधीत सहा तास वीज पुरवठा करण्याचे आदेश काढण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या निर्णयामुळे आधीच उष्णतेच्या तडाख्यात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे.
सध्या ४५ अंश तापमानामुळे शेतकरी त्रस्त झाला असून केळी बागांसह इतर पिके वाचवण्यासाठी जीवाचे रान करीत आहे. तीव्र उष्णतेमुळे अनेक पिके जळून खाक होत असताना वीज पुरवठ्यात कपात करण्यात आल्याने शेतकरी हतबल झाला आहे. अपुऱ्या वीज पुरवठ्यामुळे पिकांना वेळेवर पाणी देता येत नसल्याने मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, शेती मशागतीसाठी आवश्यक असलेल्या ट्रॅक्टरसाठी डिझेल टंचाईचाही मोठा फटका बसत आहे. शेतकरी तासन्तास ट्रॅक्टर घेऊन डिझेल पंपांवर उन्हात थांबत असल्याचे चित्र आहे. त्याचबरोबर रासायनिक खतांचे दरही गगनाला भिडल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. केंद्र सरकारने खतांचे दर पूर्ववत करावेत, अशी मागणीही करण्यात आली आहे.
याशिवाय, अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत असून नैसर्गिक संकटांमुळे शेतकरी पूर्णपणे खचला आहे. या सर्व परिस्थितीमुळे शेतकऱ्यांपुढे आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्याची वेळ येत असल्याची खंत व्यक्त करण्यात आली. सरकार व प्रशासनाने डिझेल टंचाई, रासायनिक खतांचे वाढते दर आणि वीज पुरवठा या गंभीर प्रश्नांकडे तातडीने लक्ष द्यावे व शेतकऱ्यांना पूर्ववत ८ तास वीज पुरवठा सुरू करून दिलासा द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश सचिव अनिल वाडीले यांनी केली आहे.

No comments