चोपडा शहर पोलिसांच्या सतर्कतेमुळे बालविवाह रोखण्यात यश चोपडा ता. प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) चोपडा : चोपडा शहर पोलिसांच्या तत्प...
चोपडा शहर पोलिसांच्या सतर्कतेमुळे बालविवाह रोखण्यात यश
चोपडा ता. प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा : चोपडा शहर पोलिसांच्या तत्परता व सतर्कतेमुळे एका अल्पवयीन मुलीचा बालविवाह वेळेत रोखण्यात यश आले आहे. या कारवाईमुळे पोलिसांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. चोपडा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पवनकुमार देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक युवराज वाळुंज,पोलीस कॉन्स्टेबल विलास पारधी व निलेश वाघ यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार तात्काळ घटनास्थळी धाव घेत हस्तक्षेप केला.शहरातील एका ठिकाणी अल्पवयीन मुलीचा विवाह होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी विवाहाची प्रक्रिया थांबवून दोन्ही कुटुंबीयांचे समुपदेशन केले. तसेच बालविवाहाचे कायदेशीर परिणाम समजावून सांगत हा विवाह बेकायदेशीर असल्याची जाणीव करून दिली. संबंधित मुलीचे वय १८ वर्षांपेक्षा कमी असल्याचे निष्पन्न झाल्याने विवाह थांबविण्यात आला. कायद्यानुसार मुलीचे वय १८ वर्षे व मुलाचे वय २१ वर्षे पूर्ण झाल्यानंतरच विवाह वैध मानला जातो. यापेक्षा कमी वयात विवाह करणे हा कायदेशीर गुन्हा असून बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार कठोर शिक्षेची तरतूद आहे. बालविवाह घडवून आणणारे वर-वधू, पालक, नातेवाईक, विवाह लावणारे पुजारी, पत्रिका छापणारे, मंगल कार्यालय चालक, आहार व्यवस्था करणारे तसेच उपस्थित राहून सहकार्य करणारे सर्वजण दोषी ठरू शकतात, असे पोलिसांनी स्पष्ट केले. या कारवाईत पोलीस निरीक्षक पवनकुमार देसले व त्यांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली. “बालविवाह हा सामाजिक व कायदेशीर गुन्हा असून नागरिकांनी अशा घटनांची माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी,” असे आवाहन चोपडा शहर पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.

No comments