मुक्ताईनगर तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना न्याय द्या; तहसीलदारांना निवेदन सादर सतीश गायकवाड मुक्ताईनगर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) ...
मुक्ताईनगर तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना न्याय द्या; तहसीलदारांना निवेदन सादर
सतीश गायकवाड मुक्ताईनगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मुक्ताईनगर:- तालुक्यात १ जून रोजी झालेल्या अवकाळी पाऊस, वादळ आणि गारपिटीमुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळावी, यासाठी तहसीलदार यांना निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, अंतुरलीसह मुक्ताईनगर तालुक्यातील अनेक गावांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पाऊस व गारपीट झाली. या नैसर्गिक आपत्तीमुळे केळी, कापूस, मका, ज्वारी, भाजीपाला तसेच विविध फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या घरांची पत्रे उडून गेली असून जनावरांच्या गोठ्यांची पडझड झाल्याने मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.
आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 मधील तरतुदींनुसार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासकीय मदत देण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. तसेच महसूल, कृषी व ग्रामपंचायत विभागाच्या संयुक्त पथकामार्फत तात्काळ पंचनामे करण्याची, कोणताही शेतकरी वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याची आणि नुकसानभरपाईची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची मागणी करण्यात आली. याशिवाय पीक विमा योजनेअंतर्गत विमा कंपन्यांना नुकसानाची माहिती देऊन भरपाई प्रक्रिया तातडीने सुरू करावी तसेच ज्या शेतकऱ्यांच्या घरांचे व गोठ्यांचे नुकसान झाले आहे त्यांना स्वतंत्र आर्थिक मदत द्यावी, अशी मागणीही करण्यात आली. या प्रसंगी ॲड. राहुल अशोक पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख नितीन बळीराम गोसावी, ॲड. अशोक बोडदे, ॲड. देवेंद्र बोडदे, ॲड. राहुल लहासे यांच्यासह अनेक पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते. प्रशासनाने या गंभीर परिस्थितीची दखल घेऊन तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

No comments