चोपड्यात तहसीलदारांच्या निलंबनासाठी विराट सर्वपक्षीय जनआंदोलन; प्रांत कार्यालयाने निवेदन स्वीकारले चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गा...
चोपड्यात तहसीलदारांच्या निलंबनासाठी विराट सर्वपक्षीय जनआंदोलन; प्रांत कार्यालयाने निवेदन स्वीकारले
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा,: येथील तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या विरोधात विविध गंभीर तक्रारी, अवैध गौण खनिज उत्खननाकडे कथितपणे दुर्लक्ष तसेच प्रशासकीय कामकाजाबाबत नाराजी व्यक्त करत त्यांच्या विभागीय चौकशीसह तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी सोमवारी चोपड्यात सर्वपक्षीय जनआंदोलन छेडण्यात आले. या आंदोलनात विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, पत्रकार, शेतकरी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला.
सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकातून शांततापूर्ण पद्धतीने मोर्चाला प्रारंभ झाला. घोषणाबाजी करत शेकडो नागरिक तहसील कार्यालयावर धडकले. प्रांत अधिकारी अमळनेर हे अन्य कामानिमित्त उपस्थित राहू शकले नसल्याने त्यांच्या वतीने नायब तहसीलदार श्री. जोशी यांनी आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्वीकारले. निवेदनातील सर्व मागण्या तात्काळ शासनाकडे पाठविण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
आंदोलनानंतर झालेल्या सभेत विविध मान्यवरांनी आपल्या मनोगतातून तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या कार्यपद्धतीवर टीका करत त्यांच्यावर निष्पक्ष विभागीय चौकशी करून निलंबनाची कारवाई करण्याची मागणी लावून धरली. प्रशासनाने वेळेत दखल घेतली नाही, तर भविष्यात आणखी तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही वक्त्यांनी दिला.
यावेळी गोपाळराव सोनवणे, बाळासाहेब पाटील, शशिकांत देवरे, अमृतराव वाघ, मगन बाविस्कर, दीपक सोनवणे, शुभम सोनवणे आदींनी आपली भूमिका मांडली.
या सर्वपक्षीय आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार)चे तालुका अध्यक्ष बाळासाहेब पाटील, भाजपचे शहराध्यक्ष तथा नगरसेवक नरेंद्र पाटील, भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष तथा नगरसेविका सौ. संध्या महाजन, चोसाकाचे चेअरमन चंद्रहास गुजराथी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती नारायण शालीग्राम पाटील, मनसे नेते अनिल वानखेडे, प्रदीप पाटील, मगन बाविस्कर, रवींद्र मराठे, शिवसेना (उबाठा)चे सुनील बडगुजर, शशिकांत कन्हैये, नंदलाल गोविंदा चौधरी, अमृतराव वाघ, शशिकांत देवरे, संजय कानडे, अजय पालीवाल, शशिकांत पाटील, भारतीय पत्रकार महासंघाचे विभागीय अध्यक्ष विलास पाटील, जिल्हाध्यक्ष नंदलाल मराठे, भरत धनगर, किशोर दुसाने, अमोल राजपूत, समाधान पाटील, निलेश बारी, विकी सिंधी, तुकाराम पाटील, प्रल्हाद पाटील, शामकांत परदेशी, उर्वेश साळुंखे, प्रफुल्ल स्वामी, मुन्ना शर्मा, तुळशीराम पाटील, डॉ. रोहन पाटील, गटनेते गजेंद्र जयस्वाल, गिरीश देशमुख, रणजीत देशमुख, लहूश धनगर, सुनील सोनगिरी यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि शेकडो नागरिक उपस्थित होते.
आंदोलन शांततेत पार पडले असून प्रशासनाने निवेदन स्वीकारल्याने आंदोलनकर्त्यांनी शासनाकडून लवकरात लवकर सकारात्मक निर्णयाची अपेक्षा व्यक्त केली आहे. आता या मागण्यांवर शासन आणि महसूल प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे चोपडा तालुक्याचे लक्ष लागले आहे.

No comments