संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखीचे पंढरपूरकडे भक्तिमय वातावरणात प्रस्थान प्रतिनिधी जयवंत हागोटे त्रंबकेश्वर (संपादक -:- हेमकांत गायकवाड...
संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखीचे पंढरपूरकडे भक्तिमय वातावरणात प्रस्थान
प्रतिनिधी जयवंत हागोटे त्रंबकेश्वर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
त्र्यंबकेश्वर, दि. 29 जून 2026 : आषाढी वारीसाठी संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे आज त्र्यंबकेश्वर येथून पंढरपूरकडे भक्तिमय वातावरणात प्रस्थान झाले. "ज्ञानोबा-तुकाराम" आणि "जय जय राम कृष्ण हरी"च्या अखंड गजरात हजारो वारकरी टाळ-मृदंगाच्या निनादात पालखी सोहळ्यात सहभागी झाले. सुमारे 23 दिवसांचा पायी प्रवास पूर्ण करून ही पालखी आषाढी एकादशीपूर्वी पंढरपूरात दाखल होणार आहे.
यंदा आषाढी वारीसाठी त्र्यंबकेश्वरात लाखो वारकरी आणि भाविकांनी गर्दी केली असून संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला आहे. मंदिर परिसरासह प्रमुख रस्ते वारकऱ्यांनी फुलून गेले असून सर्वत्र उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
मात्र, शहरातील सुरू असलेल्या रस्ते खोदकामामुळे यंदा पालखीच्या पारंपरिक मार्गात बदल करण्यात आला आहे. तसेच, पावसामुळे अनेक ठिकाणी चिखल झाल्याने वारकऱ्यांना चालताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. मंदिरासमोरील मुख्य रस्त्याचे काम अद्याप अपूर्ण असल्याने भाविकांनी नाराजी व्यक्त केली.
दरम्यान, पालखीसाठी आकर्षक रथाची सजावट आणि मंदिराची विद्युत रोषणाई करण्यात आली असून संपूर्ण परिसर उजळून निघाला आहे. पालखी सोहळा शांततेत आणि सुरळीत पार पडावा यासाठी प्रशासनाने सुरक्षा, वाहतूक नियंत्रण, आरोग्य सेवा, पिण्याचे पाणी तसेच इतर मूलभूत सुविधांचे विशेष नियोजन केले आहे.
या पालखी प्रस्थान सोहळ्यास राज्याचे कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे, इगतपुरी-त्र्यंबकेश्वर मतदारसंघाचे आमदार हिरामण खोसकर, अमित ठाकरे तसेच आमदार गोकुळ गीते , नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद,त्रंबकेश्वर चे तहसीलदार गणेश जाधव,त्रंबकनगर परिषदेचे नगराध्यक्षा त्रिवेणी ताई तुंगार विविध विभागांचे अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि मान्यवर उपस्थित होते.

No comments