छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकुलच्या विद्यार्थींचे रावे (RAWE) कार्यक्रम धवळेश्वर गावात प्रारंभ समाधान पाटील जि.प्र. (संपादक -:- ह...
छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकुलच्या विद्यार्थींचे रावे (RAWE) कार्यक्रम धवळेश्वर गावात प्रारंभ
समाधान पाटील जि.प्र.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मालेगाव : धवळेश्वर, येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी संलग्न छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकुल, काष्टी अंतर्गत कृषी महाविद्यालय, काष्टी येथील विद्यार्थ्यांच्या ग्रामीण कृषी कार्यानुभव (RAWE) कार्यक्रमास धवळेश्वर गावात अधिकृतपणे सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाचा उद्देश कृषी विद्यार्थ्यांना ग्रामीण भागातील प्रत्यक्ष शेतीचा अनुभव देणे तसेच शेतकरी व विद्यार्थी यांच्यातील परस्पर संवाद अधिक दृढ करणे हा आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटन व परिचय भेट धवळेश्वर ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच शोभाताई भाऊसाहेब पवार, ग्रामविकास अधिकारी रवींद्र देवरे, ग्रामस्थ व स्थानिक प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत पार पडली. या कार्यक्रमादरम्यान विद्यार्थी शेतकऱ्यांसोबत प्रत्यक्ष काम करून ग्रामीण शेती पद्धती, पीक व्यवस्थापन, शासकीय योजना तसेच शेतकरी बांधवांना भेडसावणाऱ्या समस्यांचा अभ्यास करणार आहेत.
रावे कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये संवाद कौशल्य, समस्या सोडविण्याची क्षमता तसेच व्यावहारिक कृषी ज्ञान विकसित करण्यावर भर दिला जात आहे. तसेच विद्यार्थी आधुनिक शेती तंत्रज्ञान, मृदा आरोग्य व्यवस्थापन, एकात्मिक कीड व्यवस्थापन आणि शाश्वत शेतीविषयक जनजागृती उपक्रम राबविणार आहेत.
या कार्यक्रमासाठी छत्रपती शिवाजी महाराज कृषि विज्ञान संकुल प्रमुख डॉ.एम.एस.माने सर , कृषी महाविद्यालय, काष्टीचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. एस. डी. पाटील सर यांचे मार्गदर्शन लाभत असून रावे समन्वयक डॉ. आर. पी. खुळे सर, कार्यक्रम अधिकारी डॉ. आर. एल. पाटील सर तसेच पी. एच. सोनवणे मॅडम यांचे विद्यार्थ्यांना सातत्याने मार्गदर्शन व निरीक्षण लाभत आहे.
गावातील प्रतिनिधींनी विद्यार्थ्यांचे स्वागत करून या कार्यक्रमामुळे गावातील शेतकरी व भविष्यातील कृषी पदवीधर या दोघांनाही लाभ होईल, असा विश्वास व्यक्त केला. विद्यार्थ्यांनीही कार्यक्रम कालावधीत सक्रिय सहभाग व समर्पणाने कार्य करण्याचे आश्वासन दिले.
या रावे कार्यक्रमात विद्यार्थी दुर्गेश बैरागी, विकास भोसले, हर्षद दगड़े, कुणाल गायकवाड, रोहन गायकवाड व समर्थ गायकवाड सहभागी झाले असून ते गावातील शेतकरी बांधवांसोबत विविध कृषीविषयक उपक्रम राबविणार आहेत.
हा उपक्रम कृषी महाविद्यालय, काष्टी यांच्या अनुभवाधारित शिक्षण व ग्रामीण कृषी विकासाप्रती असलेल्या बांधिलकीचे प्रतीक मानले जात आहे.

No comments