आस नदीच्या पुलावर साचलेल्या कचऱ्यामुळे धोका वाढला; बेलखेड ग्रामस्थांची त्वरित उपाययोजनेची मागणी अमोल बावस्कार बुलढाणा (संपादक -:- हेमकांत ...
आस नदीच्या पुलावर साचलेल्या कचऱ्यामुळे धोका वाढला; बेलखेड ग्रामस्थांची त्वरित उपाययोजनेची मागणी
अमोल बावस्कार बुलढाणा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
बेलखेड :- सातपुड्याच्या कुशीतून उगम पावणारी आस नदी बेलखेड परिसरासाठी जीवनदायिनी असली, तरी सध्या हाच प्रवाह गावकऱ्यांसाठी संकटाचा ठरू लागला आहे. रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे नदीपात्र भरून वाहत असताना, बेलखेड जवळील पुलावर मोठ्या प्रमाणात कचरा आणि टाकाऊ वस्तू अडकल्या आहेत. पुलाची उंची कमी असल्याने हा कचरा पाण्याचा प्रवाह अडवत असून, यामुळे नदीचे पाणी पात्राबाहेर पडून थेट वस्तीत शिरण्याची भीती निर्माण झाली आहे.
नदीच्या काठावर वसलेली अनेक घरे या साचलेल्या पाण्यामुळे धोक्याच्या छायेत आहेत. पुलावर कचऱ्याचा डोंगर साचल्याने पाण्याला पुढे जाण्यासाठी मार्गच उरलेला नाही. जर पावसाचा जोर असाच कायम राहिला आणि पाणी पातळीत वाढ झाली, तर मोठ्या वित्तहानीची किंवा जीवितहानीची शक्यता नाकारता येत नाही.
या पुलावरील साचलेला कचरा त्वरित हटवून पाण्याचा प्रवाह मोकळा करावा, जेणेकरून संभाव्य अनर्थ टाळता येईल, अशी मागणी स्वराज्य पक्षाचे अल्पसंख्याक आघाडी तालुकाध्यक्ष शेख हुशेन शेख बुऱ्हान यांनी लावून धरली आहे. प्रशासन याकडे किती गांभीर्याने पाहते आणि तातडीने मदतकार्य राबवते का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

No comments