शिरसगावात दोन वनतळी फुटली; वनविभागाच्या कामांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह जयवंत हागोटे त्रंबकेश्वर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) त्र्यंबकेश...
शिरसगावात दोन वनतळी फुटली; वनविभागाच्या कामांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
जयवंत हागोटे त्रंबकेश्वर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील शिरसगाव येथे वनविभागाच्या माध्यमातून करण्यात आलेली दोन वनतळी फुटल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे हरसुल वनपरिक्षेत्रातील वनतळी व जलसंधारणाच्या कामांच्या गुणवत्तेबाबत नागरिकांकडून गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पावसाळ्यात पाणी साठवून भूजलपातळी वाढविणे, वन्यजीव व परिसरातील शेतीला पाण्याचा आधार मिळणे, तसेच मृद व जलसंधारणाला चालना देणे या उद्देशाने वनतळी उभारली जातात. मात्र, शिरसगावातील दोन वनतळी फुटल्याने कामाची गुणवत्ता, वापरण्यात आलेले साहित्य, तांत्रिक निकष आणि कामाच्या देखरेखीबाबत चौकशीची गरज निर्माण झाली आहे. नागरिकांचे म्हणणे आहे की, संबंधित कामांची प्रत्यक्ष पाहणी करून कामाची मंजूर रक्कम, अंदाजपत्रक, तांत्रिक मान्यता, मोजमाप पुस्तिका, कामाची गुणवत्ता आणि संबंधित कंत्राटदार/यंत्रणेची जबाबदारी यांची तपासणी करण्यात यावी.
या प्रकरणाची केवळ स्थानिक पातळीवर चौकशी न करता उच्चस्तरीय व निष्पक्ष चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. वनतळी फुटण्यामागे अतिवृष्टी, पाण्याचा वाढलेला प्रवाह किंवा बांधकामातील त्रुटी यापैकी नेमके कारण काय आहे, हे तांत्रिक तपासणीनंतरच स्पष्ट होऊ शकते. त्यामुळे संबंधित विभागाने तातडीने घटनास्थळी पाहणी करून वस्तुनिष्ठ अहवाल जाहीर करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. वनसंवर्धन आणि जलसंधारणासाठी खर्च होणारा निधी योग्य पद्धतीने वापरला जात आहे का? हा प्रश्न या घटनेमुळे पुन्हा ऐरणीवर आला आहे.

No comments