हिंस्र प्राण्याच्या वाढत्या वावरामुळे ऐनतपूरमध्ये भीतीचे वातावरण वनविभाग तथा ग्रामपंचायत प्रशासनाने लक्ष द्यावे - मागणी श्रीरामपूर / प्...
हिंस्र प्राण्याच्या वाढत्या वावरामुळे ऐनतपूरमध्ये भीतीचे वातावरण
वनविभाग तथा ग्रामपंचायत प्रशासनाने लक्ष द्यावे - मागणी
श्रीरामपूर / प्रतिनिधी:
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
तालुक्यातील बेलापूर बुद्रुक येथील ऐनतपूर परिसरातील बांगल वस्ती रोडवर हिंस्र प्राण्याचा वाढता वावर असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नुकतेच रात्रीच्या सुमारास सोमनाथ वसंत राशीनकर यांच्या घरासमोरील बांधलेल्या शेळीवर हिंस्र प्राण्याने हल्ला करून एका शेळीला ठार केल्याची घटना घडली. तसेच एका कुत्र्यालाही ओढून नेल्याचे सांगण्यात आले.
या घटनेमुळे परिसरातील नागरिकांसह शाळेत जाणाऱ्या विद्यार्थी व पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे बांगल वस्ती रोडवर पथदिवे नसल्याने रात्रीच्या वेळी परिसरात मोठा अंधार असतो. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अधिक गंभीर झाला आहे.
दरम्यान, गौसे आजम सेवाभावी संस्थेच्या वतीने ग्रामपंचायत प्रशासनाकडे बांगल वस्ती रोडवर तातडीने पथदिवे बसविण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच हिंस्र प्राण्याचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभागाने परिसराची पाहणी करून आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे.
नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेता ग्रामपंचायत व वनविभागाने तातडीने दखल घेऊन परिसरात आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
वृत्त विशेष :
पत्रकार अजीजभाई शेख – राहाता
वृत्त प्रसिद्धी सहयोग :
समता मीडिया सर्व्हिसेस, श्रीरामपूर
मो. 9561174111

No comments