गणितीय राखी आणि वैज्ञानिक राखी स्पर्धेत विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला मिळाला नवा आयाम! प्रा.सतिश गायकवाड मुक्ताईनगर (संपादक हेमकांत गायकवा...
गणितीय राखी आणि वैज्ञानिक राखी स्पर्धेत विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला मिळाला नवा आयाम!
प्रा.सतिश गायकवाड मुक्ताईनगर
(संपादक हेमकांत गायकवाड)
ए. पी. जे. अब्दुल कलाम नॅशनल कौन्सिल ऑफ यंग सायंटिस्ट इंडिया यांच्या वतीने मंजाबाई महादू नारखेडे विद्यालय, रुईखेडे (ता. मुक्ताईनगर)येथे रक्षाबंधनाच्या निमित्ताने "गणितीय राखी व वैज्ञानिक राखी निर्मिती स्पर्धेचे" उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले. या अभिनव उपक्रमाचे आयोजन व मार्गदर्शन विज्ञान शिक्षिका श्रीमती योगिता ज्ञानदेव झांबरे यांनी केले.
रक्षाबंधनासारख्या पारंपरिक सणाला विज्ञान व गणिताची सुंदर जोड देत विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पनाशक्ती, सर्जनशीलता आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचे अप्रतिम दर्शन घडविले. भूमितीय आकृत्या, गणितीय सूत्रे, संख्या, पायथागोरस प्रमेय, सौरमाला, अणुरचना, डीएनए, पर्यावरण संवर्धन, ऊर्जा, जैवविविधता, अवकाश विज्ञान अशा विविध संकल्पनांवर आधारित आकर्षक, पर्यावरणपूरक आणि नाविन्यपूर्ण राख्या विद्यार्थ्यांनी तयार केल्या. प्रत्येक राखी ही केवळ कलाकृती नसून त्यामागे वैज्ञानिक विचार आणि गणितीय संकल्पना दडलेल्या असल्याचे पाहायला मिळाले.
यावेळी ए. पी. जे. अब्दुल कलाम नॅशनल कौन्सिल ऑफ यंग सायंटिस्ट इंडिया चे चेअरमन मा. श्री. सुनील वानखेडे सर यांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक करत स्पर्धेतील उत्कृष्ट विद्यार्थ्यांना संस्थेच्या वतीने प्रशस्तीपत्र व मेडल प्रदान करण्यात येणार असल्याची घोषणा केली. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी अशा उपक्रमांची अत्यंत आवश्यकता असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्येही मोठी वैज्ञानिक क्षमता दडलेली असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. श्री. आर. वाय. सोनवणे सर यांनी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलाकृतींचे मनापासून कौतुक केले. अशा नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला चालना मिळते, वैज्ञानिक विचार विकसित होतो, गणितीय संकल्पना अधिक दृढ होतात तसेच प्रत्यक्ष कृतीतून शिक्षण अधिक प्रभावी बनते, असे प्रतिपादन त्यांनी केले. केवळ पाठ्यपुस्तकापुरते शिक्षण मर्यादित न राहता विद्यार्थ्यांनी प्रयोगशील व नवोपक्रमशील बनावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
स्पर्धेतील राख्यांचे परीक्षण कला शिक्षक श्री. शशिकांत सोनवणे सर यांनी केले. विद्यार्थ्यांच्या कलाकृतींमधील वैज्ञानिक अचूकता, गणितीय मांडणी, सर्जनशीलता, पर्यावरणपूरकता आणि सादरीकरण या निकषांवर आधारित गुणांकन करण्यात आले.
या उपक्रमासाठी विज्ञान शिक्षक संदीप चौधरी सर,तुषार महाजन सर यांनी विद्यार्थ्यांना आवश्यक मार्गदर्शन केले. तसेच संदीप कांडेलकर सर,कृष्णा भंगाळे सर, संदीप महाजन सर, गजानन साखरे सर, बबिता तडवी मॅडम आणि सुनील मालचे यांनीही विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य केले.
या अभिनव उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान व गणिताबद्दलची आवड वाढली, वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित झाला आणि "शिकणे म्हणजे आनंद" हा संदेश प्रत्यक्ष कृतीतून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला. पारंपरिक सणाला आधुनिक विज्ञानाची जोड देणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी संस्मरणीय ठरला.
"राखी ही केवळ नात्यांचा धागा नाही, तर विज्ञान, गणित, सर्जनशीलता आणि ज्ञान यांना जोडणारा प्रेरणेचा धागा आहे.

No comments