आदिवासींनी नशामुक्त चळवळीत सहभागी व्हावे : पोलिस अधीक्षक निलेश तांबे उद्धव फंगाळ/ मेहकर (संपादक : हेमकांत गायकवाड) बुलढाणा : स्वातंत्र्याला...
आदिवासींनी नशामुक्त चळवळीत सहभागी व्हावे : पोलिस अधीक्षक निलेश तांबे
उद्धव फंगाळ/ मेहकर
(संपादक : हेमकांत गायकवाड)
बुलढाणा : स्वातंत्र्याला ८० वर्षे पूर्ण झाली असली तरी आजही आदिवासी आणि भटक्या-विमुक्त समाजातील अनेक कुटुंबे ज्ञानापासून वंचित आहेत. या समाजातील नागरिकांनी विशेषतः युवकांनी नशामुक्त चळवळीत सहभागी होऊन समाजातील अनिष्ट रूढी-परंपरांना छेद देण्याची गरज आहे. अल्पवयीन मुला-मुलींची लग्ने थांबवून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी समाजाने पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन बुलढाणा जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक निलेश तांबे यांनी केले.
ज्येष्ठ समाजसेवक व साहित्यिक नामदेव भोसले यांच्या भेटीदरम्यान तांबे बोलत होते. या वेळी आदिवासी व भटक्या-विमुक्त समाजाच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. शिक्षण, नशामुक्ती, सामाजिक सुरक्षितता, अल्पवयीन मुलांचे विवाह, शासकीय योजनांचा लाभ तसेच समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर विचारविनिमय झाला.
“समाजातील परिवर्तन हे केवळ शासनाच्या योजनांमधून होणार नाही, तर समाजातील प्रत्येक व्यक्तीने त्यात सहभाग घेतला पाहिजे. मुलांना शिक्षण मिळाले, व्यसनांपासून ते दूर राहिले आणि अनिष्ट प्रथा थांबल्या तर पुढील पिढीचे भविष्य निश्चितच बदलू शकते,” असे मत ज्येष्ठ समाजसेवक. नामदेव भोसले यांनी सांगितले.
नामदेव भोसले यांच्या गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या सामाजिक कार्याचे कौतुक करून त्यांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी असल्याचेही पोलिस अधीक्षक तांबे यांनी नमूद केले. नामदेव भोसले यांच्या निस्वार्थ समाजसेवेमुळे राज्यातील लाखो पिढीत कुटूंबाला न्याय मिळाला..
भटक्या-विमुक्त व आदिवासी समाजातील कुटुंबांपर्यंत शिक्षण आणि जनजागृती पोहोचविण्यासाठी सामाजिक संस्थांनी तसेच पोलिस प्रशासनाने समन्वयाने काम करण्याची गरज असल्याचे या वेळी सांगण्यात आले.
या भेटीप्रसंगी पोलिस अधीक्षक निलेश तांबे, ज्येष्ठ समाजसेवक व साहित्यिक नामदेव भोसले, बाबा भोसले, राणी भोसले आणि सचिन भोसले उपस्थित होते.
वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111


No comments