*बुलडाणा जिल्ह्यात दुष्काळाचा आगडोंब, शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी राजु शेट्टी यांची आक्रमक भूमिका शेतकऱ्यांची खरी ताकद सरकारला आं...
*बुलडाणा जिल्ह्यात दुष्काळाचा आगडोंब, शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी राजु शेट्टी यांची आक्रमक भूमिका शेतकऱ्यांची खरी ताकद सरकारला आंदोलनातुन दाखवून देऊ.प्रशांत डिक्कर.
संग्रामपुर (प्रतिनिधी)
(संपादक :- हेमकांत गायकवाड)
जिल्ह्यात ४८ दिवसांपेक्षा जास्त काळ पडलेल्या पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे कापूस , सोयाबीन,तुरी सह पिके करपून गेली असून, बळीराजा पुन्हा एकदा उघड्यावर पडला आहे. जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थिती आणि पिकविमा व कर्जमाफीच्या मुद्द्यावर राज्य सरकारचे दुर्लक्ष होत असल्याने,मा .खा.राजु शेट्टी यांच्या निवासस्थानी जाऊन प्रशांत डिक्कर यांनी भेट घेतली, शेतकऱ्यांच्या हक्काच्या मागण्यांसाठी राज्यव्यापी लढा उभारण्याची थेट घोषणा मा. खा. राजू शेट्टी आणि प्रदेशाध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी केली आहे. शिरोळ येथे पार पडलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीनंतर आंदोलनाची दिशा निश्चित झाली आहे. सरकारने केवळ कागदी घोषणा न करता, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ हेक्टरी १ लाख रुपयांची मदत जाहीर करावी, रोखलेला पीकविमा तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावा आणि सरसकट कर्जमाफी द्यावी, या मुख्य मागण्यांवर संघर्षाची धार तीव्र केली जाणार आहे. शासकीय उदासीनतेच्या विरोधात आता छत्रपती संभाजीराजे, मा. खा. राजू शेट्टी, माजी मंत्री महादेव जानकर आणि दीपकभाई केदार हे नेते संयुक्तपणे बुलडाणा, जळगाव आणि संग्रामपूर भागात वादळी दौरा करणार असुन. सरकारवर थेट राजकीय व सामाजिक दबाव वाढवण्यासाठी हा संयुक्त मोर्चा मैदानात उतरणार आहे.
वर्षानुवर्षे निसर्गाचा कोप आणि सरकारच्या तुटपुंज्या मदतीमुळे शेतकरी पिचला गेला आहे. "आता मागण्या नाही, तर हक्क हिसकावून घेणार," असा थेट इशारा प्रशांत डिक्कर यांनी प्रशासनाला दिला आहे. शेतात राबणाऱ्या बळीराजाला त्याच्या हक्काची नुकसानभरपाई मिळेपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही. जर शासनाने या मागण्यांकडे दुर्लक्ष केले, तर बुलडाण्याच्या मातीतून सुरू होणारी ही संघर्षाची ठिणगी संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलनाचा वणवा पेटवेल, असा स्पष्ट इशारा राजु शेट्टी व प्रशांत डिक्कर यांनी सरकारला दिला आहे.


No comments